मुंबई, दि. 6 - राज्यातील करोना रुग्णवाढ कमी होत आहे. करोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या कामाचं सुप्रीम कोर्टानं कौतुक केलं आहे. हे सगळं असलं तरी गाफील राहू नका, महाराष्ट्र धोक्याच्या वळणावर आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, हे आपले सर्वांचे यश आहे. आपण सर्व जण संयमाने, जिद्दीने शासनाला आणि महापालिकेला मदत करत आहात. महाराष्ट्रातील रुग्णवाढ मंदावत आहे. तरीही गाफील राहू नका. आपण निर्बंध लादून किंवा पाळून म्हणा, एक सुरुवात केली दुसऱ्या लाटेशी युद्धाची. अन्य राज्येदेखील आता लॉकडाऊन करत आहेत. तिसऱ्या लाटेचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेदेखील इशारा दिला आहे.
6 कोटी जनतेच्या दोन डोसची जबाबदारी केंद्राने आपल्यावर टाकली आहे, ती आपण समर्थपणे पेलवणार आहोत, असेही ते म्हणाले. आपल्याला दुसरी लाट थोपवायची आहेच, परंतु तिसऱ्या लाटेचा घातक परिणाम राज्यावर होऊ द्यायचा नाही, याचा चंग बांधून राज्य काम करत आहे.
आपण गरजेनुसार रेमडेसिविरचा पुरवठा करत आहोत. 1800 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती राज्यातच करणार आहोत. लवकरात लवकर मिशन ऑक्सिजन खाली आपण महाराष्ट्रास ऑक्सिजनबद्दल स्वयंपूर्ण करत आहोत. ही अटकळ नाही तर आवश्यकता आहे. तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी महाराष्ट्रात सुरू आहे, असे ते म्हणाले.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

