हिंगोली प्रतिनिधी : हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वारे, विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. सध्या शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त असतानाच अवकाळी पावसामुळे त्यांची मोठी तारांबळ उडत आहे.
सेनगाव तालुक्यातील कडोळी परिसरात २७ मे रोजी सायंकाळच्या सुमारास मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कडोळी, माझोड, गोरेगावसह परिसरात तासभर मुसळधार पाऊस कोसळला. यावेळी कडोळी गावात गारपीटही झाली.
दरम्यान, कडोळी गावाजवळील तपोवन रोडवरील ओढ्याला अचानक पूर आल्याने काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. जोरदार पावसामुळे परिसरातील जनजीवनावर परिणाम झाला असून शेतकऱ्यांच्या शेतीकामांनाही फटका बसला आहे.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या प्रचंड उकाड्यापासून नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

