Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Monsoon forecast : कमी पावसाच्या अंदाजाने बळीराजा चिंतेत; यंदा अवघा 90 टक्के पाऊस, अल निनोमुळे शेतीवर संकट

Monsoon forecast : कमी पावसाच्या अंदाजाने बळीराजा चिंतेत; यंदा अवघा 90 टक्के पाऊस, अल निनोमुळे शेतीवर संकट

प्रभात 2 weeks ago

Monsoon forecast : देशभरात यंदाच्या पावसाळ्याबाबत चिंताजनक वृत्त समोर येत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) २०२६ च्या नैऋत्य मोसमी पावसाच्या (मानसून) अंदाजात पुन्हा एकदा कपात केली आहे.

यंदा देशात सरासरीच्या अवघा ९० टक्के पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून हा पाऊस ‘सामान्यपेक्षा कमी’ मानला जातो. यापूर्वी हवामान विभागाने ९२ टक्के पावसाची शक्यता वर्तवली होती, मात्र आता परिस्थिती अधिक बिकट होण्याची चिन्हे आहेत.

हवामान विभागाच्या मते, या अंदाजात ४ टक्के कमी-अधिक फरक (मॉडेल एरर मार्जिन) होऊ शकतो. यंदा मान्सून काळात ‘अल निनो’ (El Nino) स्थिती निर्माण होणार असल्याने पाऊस कमकुवत राहण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, भारतीय मान्सूनवर प्रभाव पाडणारा दुसरा महत्त्वाचा घटक असलेला ‘इंडियन ओशन डिपोल’ (IOD) या हंगामात ‘न्यूट्रल’ म्हणजेच तटस्थ राहण्याची शक्यता आहे.

देशातील मान्सूनच्या पावसाची ‘लॉन्ग पिरियड एव्हरेज’ (LPA) ८७ सेंटीमीटर आहे, जी १९७१ ते २०२० सालापर्यंतच्या आकडेवारीवर आधारित आहे.

शेती क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता –

हवामान विभागाच्या या दुसऱ्या टप्प्यातील अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता कमालीची वाढवली आहे. उत्तर-पूर्व भारत वगळता देशातील कोणत्याही भागात यंदा ‘सामान्य’ पावसाची अपेक्षा नाही. सर्वात मोठी काळजीची बाब म्हणजे, ज्या मुख्य शेती क्षेत्रातील (कोर झोन) शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असते, तिथेही पाऊस सामान्यपेक्षा कमी म्हणजेच ‘एलपीए’च्या ९४ टक्क्यांपेक्षा कमी राहू शकतो.

या मुख्य शेती क्षेत्रात देशातील मध्य आणि पश्चिम भागांचा समावेश होतो. येथे कमी पाऊस झाल्यास त्याचा थेट आणि प्रतिकूल परिणाम कडधान्य व तेलबियांच्या पिकांवर होऊ शकतो. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, तुरी, उडीद, कापूस, ऊस आणि काही तृणधान्यांच्या (मोटे अनाज) उत्पादनाला फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

संकट निवारणासाठी सरकार सज्ज –

एकीकडे पावसाचे सावट असताना, दुसरीकडे सरकार मात्र या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचा दावा करत आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ‘खरीप २०२६ मोहिमे’ दरम्यान बोलताना सांगितले की, सरकार कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या १.७३ दशलक्ष क्विंटल बियाण्यांव्यतिरिक्त, सरकारने १७४,००० क्विंटल बियाण्यांचा अतिरिक्त आणीबाणीचा साठा तयार ठेवला आहे. दुबार पेरणी किंवा उशिरा होणाऱ्या पेरणीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत या बियाण्यांचा वापर केला जाईल. यंदा देशभरात खरीप पिकांसाठी एकूण १.९३ दशलक्ष टन बियाणे उपलब्ध असून, हे प्रमाण गरजेपेक्षा जास्त असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

जून महिन्यात कडक उन्हाळा आणि पावसाची ओढ –

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर २०२६ दरम्यान देशातील बहुतांश भागांत कमी पाऊस पडेल. मात्र, उत्तर-पश्चिम आणि उत्तर-पूर्व भारताचे काही भाग, दक्षिण द्वीपकल्पाचा पूर्व भाग, मध्य-पूर्व भारत आणि पूर्व भारतातील काही मोजक्या भागांत सामान्य किंवा त्याहून अधिक पाऊस होऊ शकतो.

संपूर्ण हंगामाचा विचार बाजूला ठेवला, तरी केवळ जून महिन्याची सुरुवात अत्यंत संथ गतीने होणार आहे. जून महिन्यात देशभरात सरासरीच्या अवघा ९२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पावसाच्या या विलंबामुळे खरिपाची मुख्य पिके, विशेषतः भात (धान) आणि मक्याच्या पेरण्या लांबणीवर पडू शकतात.

पावसाच्या टंचाईसोबतच जून महिन्यात नागरिकांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार आहे. मध्य, उत्तर-पश्चिम आणि पूर्व भारताचे काही भाग वगळता देशातील बहुतांश भागांत कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. तसेच, मान्सूनच्या आगमनालाही यंदा काहीसा विलंब झाला आहे. जो मान्सून आधी २६ मे रोजी धडकणार होता, तो आता १ जूनच्या सुमारास येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी स्पष्ट केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat