नवी दिल्ली - सीबीएसई बोर्डाच्या प्रलंबित दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता लवकरच घेण्यात येणार असून त्या परीक्षांसाठी पूर्वीच्या तीन हजार केंद्रांऐवजी पंधरा हजार केंद्रे तैनात ठेवली जातील अशी माहिती मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाला निशंक यांनी आज दिली. करोनाच्या लॉकडाऊनमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षा आता 1 ते 15 जुलै या अवधीत घेतल्या जाणार आहेत.
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोचण्यासाठी मोठा प्रवास करावा लागू नये तसेच त्यांना सोशल डिस्टसिंगचा नियम पाळता यावा यासाठी ही केंद्रे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले. गृहमंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार कंटेमेंट झोनमध्ये कोणतीही परीक्षा घेता येणार नाही.
या विभागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या नियोजित परीक्षा केंद्रावर पोचवण्याची जबाबदारी संबंधित राज्यांनी घ्यायची आहे.
या परीक्षांपैकी बारावीच्या संपूर्ण देशातील परीक्षा अजून घ्यायच्या राहिल्या आहेत. तर दहावीच्या परीक्षा बऱ्याच ठिकाणी पूर्ण झाल्या असून केवळ उत्तरपूर्व दिल्लीतील काही केंद्रावर दहावीची परीक्षा घेणे बाकी आहे. ते काम या निर्धारित कालावधीत पूर्ण केले जाणार आहे. या परीक्षांच्या उत्तर पत्रिका संबंधित तपासणीसांकडे पाठवण्यासाठीही तीन हजार केंद्रे उघडण्यात येणार आहेत.

