Stock market : जागतिक शेअर बाजारांच्या क्रमवारीत भारताला मोठा धक्का बसला असून बाजार भांडवलाच्या (मार्केट कॅपिटलायझेशन) आधारे भारत आता सातव्या क्रमांकावर घसरला आहे. अवघ्या आठवडाभरात प्रथम तैवान आणि त्यानंतर दक्षिण कोरियाने भारताला मागे टाकत जागतिक क्रमवारीत आघाडी घेतली आहे.
ब्लूमबर्गच्या ताज्या आकडेवारीनुसार, दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराचे एकूण बाजारमूल्य यंदा ८६ टक्क्यांनी वाढून ५ ट्रिलियन डॉलर (सुमारे ५०० लाख कोटी रुपये) इतके झाले आहे. या वाढीमुळे दक्षिण कोरियाने कॅनडा, जर्मनी, ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या विकसित अर्थव्यवस्थांनाही मागे टाकले आहे.
दुसरीकडे, भारतीय शेअर बाजाराचे एकूण बाजारमूल्य सुमारे ४.८ ट्रिलियन डॉलरपर्यंत घसरले असून त्यामुळे भारत सहाव्या स्थानावरून सातव्या क्रमांकावर आला आहे. गेल्याच आठवड्यात तैवानने भारताला मागे टाकून पाचवे स्थान पटकावले होते. सध्या तैवान अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँगनंतर पाचव्या क्रमांकावर आहे.
एआय आणि सेमीकंडक्टर क्षेत्रामुळे कोरिया-तैवानची झेप –
दक्षिण कोरिया आणि तैवानच्या बाजारातील वेगवान वाढीमागे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि सेमीकंडक्टर उद्योगाचा मोठा वाटा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
– चार दिवसांच्या घसरणीनंतर दमदार पुनरागमन; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ₹3.28 लाख कोटींची भर
दक्षिण कोरियातील आघाडीच्या चिप उत्पादक कंपन्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आणि एसके हायनिक्स यांनी एआय मेमरी-चिप क्षेत्रातील मजबूत कामगिरीच्या जोरावर बाजाराला मोठी चालना दिली आहे. या कंपन्यांच्या वाढत्या मूल्यांकनामुळे कोरियाचा कोस्पी निर्देशांक २०२६ मध्ये १०० टक्क्यांहून अधिक परतावा देण्यात यशस्वी ठरला आहे.
तैवानमध्ये जगातील सर्वात मोठी कॉन्ट्रॅक्ट चिप उत्पादक कंपनी टीएसएमसी (तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी) ही बाजारवाढीचा प्रमुख आधार ठरली आहे. कंपनीच्या शेअरमध्ये यंदा ४६ टक्क्यांची वाढ झाली असून तैवानच्या प्रमुख निर्देशांकात तिचा वाटा सुमारे ४२ टक्के आहे.
भारत मागे पडण्याची कारणे –
भारतीय शेअर बाजाराच्या घसरणीमागे अनेक घटक कारणीभूत मानले जात आहेत. त्यामध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सातत्याने नफा-वसुली व निधीची माघार, डॉलरच्या तुलनेत रुपयातील कमजोरी, एआय आणि प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या सूचीबद्ध कंपन्यांचा तुलनेने अभाव यांचा समावेश आहे.
जागतिक गुंतवणूकदार सध्या एआय आणि सेमीकंडक्टर क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. या क्षेत्रात भारताची उपस्थिती मर्यादित असल्याचा परिणाम बाजारमूल्यावर होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत अद्याप आघाडीवर –
शेअर बाजाराच्या मूल्यांकनात दक्षिण कोरिया आणि तैवानने भारताला मागे टाकले असले, तरी अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या दृष्टीने भारत अद्याप त्यांच्यापेक्षा खूप मोठा आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अंदाजानुसार भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ४.१५ ट्रिलियन डॉलर असून दक्षिण कोरियाचा जीडीपी १.९३ ट्रिलियन डॉलर आहे.
अॅसेट व्हॅल्यू इन्व्हेस्टर्सचे वरिष्ठ गुंतवणूक विश्लेषक रॉस मॅकगॅरी यांच्या मते, दक्षिण कोरियातील तेजी मोठ्या प्रमाणात सेमीकंडक्टर उद्योगावर आधारित आहे. त्यामुळे ही वाढ दीर्घकाळ टिकण्यासाठी व्यापक कॉर्पोरेट गव्हर्नन्स सुधारणांची आवश्यकता आहे.
भारतासाठी ही घडामोड नवीन तंत्रज्ञानाधारित उद्योगांना अधिक चालना देण्याचा इशारा मानली जात असली, तरी मजबूत आर्थिक वाढ आणि भक्कम मूलभूत घटकांमुळे दीर्घकालीन दृष्टीने भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराची स्थिती सकारात्मक राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

