Yogi Adityanath - काँग्रेस आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययुडीएफ) यांनी घुसखोरांना येथे येऊ देत आसामची लोकसांख्यिकीय रचना बदलण्याचा प्रयत्न केला.
या घुसखोरांनी तुमच्या अधिकारांवर दरोडा टाकला.
त्यांनी आसामच्या लोकांचे रेशन, घरे आणि जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला. पण आता आसामच्या भूमीतून लव्ह जिहाद, लँड जिहाद हद्दपार करणार असे आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी केले.
निवडणुका होऊ घातलेल्या आसाममधील बारपेटा येथे एका सभेला संबोधित करताना, आदित्यनाथ यांनी आरोप केला की, या दोन्ही विरोधी पक्षांनी आसामच्या संस्कृतीशी खेळ मांडला आहे.
आता प्रत्येक घुसखोराची ओळख पटवून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशला दंगे, संचारबंदी आणि माफियांच्या विळख्यातून मुक्त करण्यात आले, तीच धोरणे आसाममध्येही राबवली जातील. इथेल डबल इंजिन सरकार त्याच भूमेतून काम करेल.
आदित्यनाथ यांनी निदर्शनास आणून दिले की, मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने महान गायक-संगीतकार भूपेन हजारिका आणि आसामचे पहिले मुख्यमंत्री गोपीनाथ बोरदोलोई यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे.
केंद्र सरकारने संस्कृती आणि परंपरा यांना चालना देण्यासाठीही पावले उचलली आहेत; तसेच सुरक्षा आणि सुशासन सुनिश्चित करत, कोणत्याही भेदभावाशिवाय लोकांना विविध योजनांचे लाभ मिळवून दिले आहेत.
गेल्या ६० वर्षांत काँग्रेसने अशांतता, दंगे, संचारबंदी आणि घुसखोरीलाच प्रोत्साहन दिले. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील गेंड्यांचे संवर्धन करण्याची किंवा आसामची संपर्कव्यवस्था सुधारण्याची काँग्रेसने कधीच पर्वा केली नव्हती.
आसाम हे आतापर्यंत आपल्या चहासाठी जगभर प्रसिद्ध होते; मात्र आता मोदींच्या प्रेरणेने ते सेमिकंडक्टर चिप्स’चे केंद्र बनत आहे. राज्याच्या जागीरोड येथे सेमिकंडक्टर प्रकल्प उभारला जात आहे.

