पालघर २४ मे (हिं.स.) टाळेबंदीत लागू असलेले निर्बंध हळूहळू मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एन. एच. एस. आर. सी. एल) आपल्या सर्व कामांना पुन्हा सुरुवात केली आहे. त्यात सर्व ठिकाणची कार्यालये उघडण्याबरोबरच जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू करणे, संमती शिबिरे आयोजित करणे आणि युटिलिटी स्थलांतरित करणे या कामांचा समावेश आहे. टाळेबंदीच्या कालावधीत सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्यात आला. त्यात आयआरटीएस आणि जॅपनीज इंटरनॅशनल कन्सल्टंट यांनाही सहभागी करून घेण्यात आले होते. या कालावधीतच एनएचएसआरसीएलतर्फे तीन सक्रिय टेंडर्ससाठी प्रथमच ऑनलाइन प्री-बिड बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते.
टाळेबंदीत लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध आता हळूहळू मागे घेतले जात असताना एनएचएसआरसीएलची नित्यकर्मेही सुरू होऊ लागली आहेत. परंतु अंतरसोवळे (सोशल डिस्टन्सिंग) आणि उच्च दर्जाची स्वच्छता यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. एनएचएसआरसीएलची सर्व कार्यालयेही आता पुन्हा सक्रिय होऊ लागली आहेत. अलीकडेच सुरत जिल्ह्यातील मुलड या गावात संमती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुरत आणि अहमदाबाद येथे युटिलिटी स्थलांतराचे काम पुन्हा सुरू करण्यात आले असून साबरमती हब बांधकाम स्थळावर बांधकामाने वेग घेतला आहे. नजीकच्या भविष्यात एनएचएसआरसीएल पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल, याची आम्हाला खात्री आहे. हिंदुस्थान समाचार
Disclaimer
This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt Publisher: Hindusthan Samachar Marathi