जयेश मेस्त्री
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांचा राजीनामा घेतल्यानंतर अभिजित दिपके (Abhijeet Dipke) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना टोमणा मारण्याच्या उद्देशाने म्हणाला, 'सुबह हो गई मामू.' त्याच्या दृष्टिकोनातून याचा अर्थ आम्ही तुम्हला झुकवलं, आता यापुढे तुमची काही चालणार नाही, आता पुढे आम्ही बोलू तसं तुम्हाला वागावं लागेल, जर आमचं नाही ऐकलं तर आम्ही प्रत्येक वेळी आंदोलने करु, हिडिस चाळे करु आणि तुम्हाला पुन्हा झुकावं लागेल.
अभिजितचं वय साधारण ३० वर्षे आहे. मोदी सुमारे २५ वर्षांपासून सत्तेवर आहेत. २००१ साली ते पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. १९७० साली ते पूर्णवेळ सामाजिक जीवनात आले. म्हणजे त्यांचं सामाजिक जीवन सुमारे ५६ वर्षांचं आहे. खरंतर त्याआधीपासूनच ते सामाजिक जीवनात सक्रिय होते. १९८७ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. म्हणजे त्यांचं राजकीय जीवन ३९ वर्षांचं आहे. दुसरी गोष्ट ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नव्हते. त्यांनी जे यश मिळवलं ते स्वबळावर… सीजेपीच्या धिंगाणा पार्टीमध्ये सौरव दास मोदींना चिडवत 'फ्रांड्स' म्हणाला. सीजेपीच्या कथित किंवा कागदावरील विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि माज खूपच वाढलेला आहे. आनंद रंगनाथन यांनी डिबेटमध्ये प्रश्न विचारला की असंच आंदोलन पंजाबमध्ये करणार का? पंजाबच्या शिक्षणमंत्र्याचा राजीनामा घेणार का? तर त्याच्याकडे याचं उत्तर नव्हतं. तर हे कॉकरोच म्हणजेच कीटक आता आजोबांच्या वयाच्या मोदींना चिडवत आहेत. आंदोलनामध्ये लेफ्ट विंगच्या हिडिस मुलांनी याच आजोबांच्या वयाच्या आणि देशातील अत्यंत माननीय पद असलेल्या माणसाला शिव्या दिल्या.
खरंतर ही शिव्या देणारी बहुतेक मुलं एलाइट क्लासमधली होती. गरीब किंवा सामान्य मध्यमवर्यीय दिसत नव्हती. या मुलांना अजून जीवनाचा चटका किंवा अगदीच झळ देखील बसलेली नाही. मी वर मोदींच्या राजकीय सामाजिक आणि सत्तेच्या जीवनमानाबद्दल एवढ्याचसाठी लिहिलं आहे की हा माणूस तुम्हाला आवडो अथवा न आवडो, हा माणूस संघर्षातून आज या पदावर पोहोचला आहे. सोनिया गांधींच्या हातात देशाची पूर्ण सूत्रे असताना सोनिया यांनी या माणसाला नेस्तनाबूत करण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं, तरी त्यातून या माणसाने झेप घेत गुजरातवर उत्तम शासन करुन दाखवलं आणि पुढे याच माणसाने सोनिया गांधींचा अहंकार नष्ट केला. त्यानंतर डाव्यांना बिस्किटे टाकणारी कॉंग्रेस पूर्णपणे डाव्या विचारांना शरण गेली. राहुल गांधी ज्याप्रमाणे वागतात, त्यानुसार त्यांची स्ट्रॅटेजी डावेच ठरवत असावे, असे वाटते. मोदींना रोखण्यासाठी अनेक लोक सोडण्यात आले. जिग्नेश मेवाणी एकदा म्हणाला होता की, 'मोदी को हड्डिया गलाने के लिये हिमालय जाना चाहिए.' आज जिग्नेश कुठे आहे? हार्दिक पटेलला गुजरातमध्ये 'मोदी इको सिस्टीम'ला शह देण्यासाठी उभं करण्यात आलं. नंतर तोच या इको सिस्टीममध्ये विरघळून गेला. कन्हैया कुमारही बिचारा डाव्याचा कॉंग्रेसी झाला. आता सीजेपी (CJP) म्हणजे कॉकरोच कीटक खूप आनंदात आहेत, त्यांच्या मते त्यांनी मोदींना झुकवलं. ज्या सो-कॉल्ड जेन झीच्या आंदोलनामुळे (Gen Z Protests) मोदींकडून परास्त झालेले डावे थेरडे देखील सुखावले आहेत. त्यांचं हे सुख म्हणजेच मोदींचा विजय आहे.
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १०० वर्षांनंतरही मजबूत होत आहे. याचा अभ्यास वगैरे सोडा पण साधा तर्क तरी लावलाय का या डाव्यांनी? खोटी टीका, नींदा, नालस्ती ही संघाची ताकद आहे. कारण या सर्व गोष्टी घडत असताना संघ कधीही संघ होण्याचं सोडत नाही. म्हणजे श्रीरामाला वनवासात धाडलं तरी राम हा रामच राहिला. तो रागावला नाही, बिथरला नाही… तो स्थित राहिला. हाच आदर्श संघ आणि पुढे संघातून आलेले मोदी यांनी घेतला आहे. एवढी टीका झाल्यानंतरही मोदींनी शिव्या देणाऱ्यांना दुषणे दिली नाहीत. उलट त्यांनी जेन झीशी संवाद साधला. त्यातही ट्रोलर्स सहन करावे लागले. पण त्यांनी संयम बाळगला. मोदी हे मोदीच राहिले. अनेक अस्त्र या डाव्या लोकांनी मोदींवर सोडले. कोणत्या अस्त्राला सामोरं जायचं आणि कोणत्या अस्त्रापुढे शरणागती पत्करायची याची जाणीव दीर्घ अनुभव असलेल्या मोदींना नक्कीच आहे. २०२४ मध्ये निवडणुकीत भाजपाला अपेक्षेपेक्षाही कमी जागा मिळाल्या. पण नंतर अनेकांचा विश्वास जिंकत त्यांनी सरकार स्थिर ठेवले. कॉकरोचला वाटलं होतं की या आंदोलनात मित्रपक्ष त्यांची साथ सोडतील आणि मोदी राजीनामा देतील. पण मित्रपक्षांनी यावर भाष्यच केलं नाही. त्यांनीही स्थिर राहण्याची भूमिका स्वीकारली. जेव्हा तुम्ही सतत सत्तेवर असता तेव्हा लोकांना वाटू लागतं की ही सत्ता मुजोर आहे. हा लोकसंख्येचा स्थायीभाव आहे. तेव्हा त्यांचा राग बाहेर काढण्यासाठी त्यांना काहीतरी कार्यक्रम द्यावा लागतो. म्हणूनच कोरोनोमध्ये मोदींनी थाळ्या वाजवण्याचा कार्यक्रम लोकांना दिला. जेणेकरुन सर्वसामान्य लोकांना वाटलं की आपणंही काहीतरी केलं आहे. सीजेपीचं आंदोलन जरी मोदी सरकारच्या विरोधात असलं तरी ही लोकांसाठी 'कॅथर्सिस थेरपी' ठरली आहे. विशेषतः जेन झीच्या आधीच्या पिढीसाठी. कॅथर्सिस म्हणजे मोकळं होणं. आपण दुःख मनात दडपून ठेवतो, त्याऐवजी रडणं, ओरडणं आणि मोकळं होणं. मनात साचलेला मळ काढून टाकणं. ही हिडिस नसलेल्या, लेफ्ट विंगचे नसलेल्या राष्ट्रभक्त जेन झीसाठीही कॅथर्सिस थेरपी ठरली आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनातील फालतू शिवराळ भाग वगळला तर अनेकांना सरकार कुठेतरी चुकतंय असं वाटू लागलं होतं. २०-२५ दिवस हे आंदोलन चालल्याने आता अनेकांचं मन मोकळं झालं आहे. सरकारने कायदेही कठोर केल्याने आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने लोकांना वाटू लागलंय की सरकार विद्यार्थ्यांचा विचार करतंय. दुसरी गोष्ट या आंदोलनातील हिडिस प्रकारामुळेही राष्ट्रभक्त जेन झीला त्रास झाला. त्यामुळे सरकारमध्ये सुधारणा आवश्यक आहे. पण हे सरकारंच नको ही भावना आता पूर्णपणे लयाला गेली आहे. विशेष म्हणजे प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सीजेपी आणि सरकारची संयुक्त पत्रकार परिषद सीजेपीच्या प्रामाणिकतेवर संशय घेणारी ठरली आहे. आता झुरळ मंडळी कितीही बेडकी फुगवत असली तरी भारताला नेपाळ बनवण्याचा त्यांचा डाव फसला आहे. त्यामुळे अभिजित दिपके (Abhijeet Dipke) मोदींना चिडवण्यासाठी 'सुबह हो गई मामू' म्हणाला असला तरी मोदींचं एक वाक्य आगाऊ दिपकेच नव्हे तर सबंध डाव्या इको-सिस्टीमने लक्षात ठेवायला हवं. ते एकदा संसदेत म्हणाले होते,
'तमाशा करने वालों को क्या ख़बर,
हमने कितने तूफ़ानों को पार
कर दिया जलाया हैं।'

