Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

बँकिंग क्षेत्रावर 'Mythos AI' चे सावट; सायबर हल्ल्यांच्या धोक्यामुळे अर्थमंत्रालयाची तातडीची बैठक

भारतातील बँकिंग (Indian Bank) आणि पेमेंट क्षेत्राला संभाव्य सायबर हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी केंद्र सरकार सतर्क झाले आहे. 'अँथ्रोपिक' (Anthropic) या कंपनीने विकसित केलेल्या 'मायथोस' (Mythos) नावाच्या अत्यंत शक्तिशाली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मॉडेलमुळे जागतिक स्तरावर सायबर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर, केंद्रीय अर्थमंत्रालयाने देशातील प्रमुख बँकांच्या प्रमुखांसोबत एक आपत्कालीन बैठक बोलावली. या बैठकीत बँकांनी खात्री दिली आहे की, ते आपल्या डिजिटल प्रणालीला कोणत्याही बाह्य धोक्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलत आहेत. (Mythos AI)

‘मायथोस एआय’ आणि बँकिंग समोरील आव्हाने‘मायथोस’ हे एआय मॉडेल सॉफ्टवेअरमधील जुन्या आणि लपलेल्या त्रुटी शोधून त्याद्वारे सायबर हल्ला करण्यात मानवापेक्षाही अधिक वेगवान असल्याचे मानले जाते. जरी या कंपनीने हे मॉडेल सार्वजनिकरीत्या उपलब्ध केलेले नाही, तरीही काही अनधिकृत व्यक्तींनी या प्रणालीमध्ये प्रवेश मिळवल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. बँकांचे आयटी (IT) जाळे हे ग्राहक, कंपन्या आणि इतर वित्तीय सेवांशी जोडलेले असते. जर या प्रणालीवर हल्ला झाला, तर देशाची आर्थिक स्थिरता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे बँकांनी आता ‘प्रोजेक्ट ग्लासविंंग’ (Project Glasswing) अंतर्गत या धोक्यांचा अभ्यास सुरू केला आहे.

जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरणहा धोका केवळ भारतापुरता मर्यादित नसून अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन यांसारख्या प्रगत देशांनीही आपल्या बँकांसाठी धोक्याचा इशारा जारी केला आहे. विशेषतः युपीआय (UPI) सारख्या मोफत आणि वेगवान पेमेंट प्रणालीमुळे भारतात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण प्रचंड आहे. सायबर गुन्हेगार प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून डेटा चोरी किंवा आर्थिक फसवणूक करू शकतात. या परिस्थितीवर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) जागतिक नियामक संस्थांशी चर्चा करत असून बँकांना त्यांच्या सुरक्षा भिंती अधिक मजबूत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Mythos AI)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post