भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सातत्याने वाढणाऱ्या जवळीकीमुळे पाकिस्तानच्या (Pakistan) चिंता वाढल्या आहेत. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारच्या एका मंत्र्याने नुकत्याच केलेल्या भारत दौऱ्यादरम्यान, 'भारत आणि अफगाणिस्तानच्या लोकांचा 'डीएनए' एकच आहे,' असे विधान करत दोन्ही देशांतील ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंधांवर भर दिला होता.
या विधानामुळे संतापलेल्या पाकिस्तान (Pakistan) लष्कराने थेट धार्मिक संदर्भ देत अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे.
पाकिस्तानी लष्कराचा तालिबानवर घणाघात
पाकिस्तान (Pakistan) लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी पत्रकार परिषदेत तालिबान मंत्र्याच्या ‘डीएनए’बाबतच्या विधानाला प्रत्युत्तर दिले. धार्मिक ग्रंथातील वचनांचा हवाला देत त्यांनी म्हटले की, “मुस्लिमांनी बिगर-मुस्लिमांना आपले मित्र किंवा संरक्षक बनवू नये. सामान्य अफगाणी जनता तालिबानच्या दडपशाहीमुळे त्रस्त असून, दोघांचा डीएनए एकसारखा असूच शकत नाही.”
पाकिस्तानी प्रवक्त्याने पुढे जात भारत सरकार, भाजप आणि आरएसएसवरही टीका केली. “तालिबान आणि भारत यांच्यात ‘मालक आणि गुलाम’ यांसारखे संबंध आहेत. भारतातील व्यवस्था ही मालक असून तालिबान सरकार त्यांच्या अजेंड्याची सेवा करत आहे,” असा अजब आरोप त्यांनी केला. याशिवाय, तालिबान राजवटीत महिला आणि बालकांवर अत्याचार होत असून त्यांच्या कारवायांचा इस्लामशी काहीही संबंध नाही, असा दावाही लष्करी प्रवक्त्याने केला.
अंतर्गत अपयश लपवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न
तालिबान भारताच्या सांगण्यावरून काम करत असल्याचे आरोप भारताने याआधीच ठामपणे फेटाळून लावले आहेत. भारतीय गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान (Pakistan) सध्या गंभीर अंतर्गत संकटांचा सामना करत आहे. बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा या भागांत दररोज होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे तेथील नागरिक लष्कर आणि सरकारवर प्रचंड नाराज आहेत. चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाच्या (CPEC) सुरक्षेबाबत चीनकडून पाकिस्तानवर (Pakistan) मोठा दबाव आहे. आपले हे सर्व अंतर्गत अपयश झाकण्यासाठी आणि जनतेचे लक्ष भलतीकडे वळवण्यासाठीच पाकिस्तानी (Pakistan) लष्कर अशा प्रकारची तथ्यहीन आणि वादग्रस्त विधाने करत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

