पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची घटना घडली आहे. या भूस्खलनामुळे गडावरील मंदिराकडे जाणाऱ्या पायी मार्गाचा काही भाग पूर्णपणे खचला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुढील आदेश येईपर्यंत भाविकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी अनेक झाडे, विजेचे खांब आणि लोखंडी सुरक्षा रेलिंगचे नुकसान झाले आहे.(Mahalaxmi Fort Landslide in Dahanu)
प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मलबा हटविण्याचे तसेच मार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे की, त्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि निर्बंध उठेपर्यंत गडाकडे जाणे टाळावे. महालक्ष्मी गडावर मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असून पावसाळ्यास विशेष सणासुदीच्या दिवशी आणि सुट्ट्यांच्या दिवशी भाविकांची गर्दी होते. अश्यात दरड कोसळल्यास मोठी घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे.(Mahalaxmi Fort Landslide in Dahanu)
महालक्ष्मी सुळक्यावरून छोट्या मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याचे प्रकार काही वर्षांपासून सुरू असून २०२२ साली गडावर अश्याच प्रकारची मोठी दरड कोसळली असून यामध्ये तीन दुकानांचे नुकसान झाले होते. गेल्या वर्षीही ऑगस्ट महिन्यात गडाच्या सुळक्यावरून मंदिर परिसरातील सात दुकानांपैकी चार दुकाने दरीत कोसळली तसेच इतरांवर दगडी पडल्यामुळे नुकसान झाले होते.(Mahalaxmi Fort Landslide in Dahanu)

