मार्चच्या अखेरपर्यंत भारताने रशियाकडून ५५.५ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची आयात केली, जी जून २०२५ नंतरची सर्वाधिक आहे.
मध्य पूर्वेत पुरवठा खंडित झाल्यामुळे, विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद झाल्याने, भारतीय रिफायनऱ्यांनी मॉस्कोकडून खरेदी वाढवली, असे जहाज ट्रॅकिंग डेटामध्ये दिसून आले आहे. (India Crude Oil Imports)
Kpler या कमोडिटी अॅनालिटिक्स कंपनीच्या माहितीनुसार, फेब्रुवारीतील २९ दशलक्ष बॅरलच्या तुलनेत रशियाकडून आयात ८९ टक्क्यांनी वाढली आहे. अमेरिकेने रशियन तेलावर दिलेल्या निर्बंध सवलतीनंतर ही वाढ झाली, ज्यामुळे भारतीय रिफायनऱ्यांना ४ मार्चपर्यंत निर्बंधित आणि निर्बंधमुक्त दोन्ही प्रकारचे तेल खरेदी करण्याची परवानगी मिळाली होती.
भारतीय रिफायनऱ्यांनी (Indian Refiners) रशियन तेल खरेदी पूर्णपणे थांबवली नव्हती, मात्र Rosneft आणि Lukoil या मोठ्या कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध घातल्यानंतर खरेदीत घट झाली होती. त्यामुळे नोव्हेंबरमधील ५५ दशलक्ष बॅरलवरून फेब्रुवारीत ती २९ दशलक्ष बॅरलपर्यंत खाली आली होती.
पश्चिम आशियातील संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे भारताची एकूण कच्च्या तेलाची आयात मार्चमध्ये १२७ दशलक्ष बॅरलवर घसरली, जी फेब्रुवारीतील १४५ दशलक्ष बॅरलच्या तुलनेत कमी आहे, असे Kplerच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
होर्मुझ सामुद्रधुनी पर्शियन आखात आणि अरबी समुद्राला (arabian sea) जोडते आणि जगातील सुमारे २० टक्के तेल वाहतूक या मार्गे होते, त्यामुळे ती जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतासाठी, जो जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल आयातदार आहे, सुमारे ४०-५० टक्के कच्चे तेल या मार्गे येते.
सौदी अरेबिया हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरवठादार राहिला असून १७.५ दशलक्ष बॅरल आयात झाली. त्यानंतर अंगोलाचा क्रमांक लागतो, ज्यातून १०.२ दशलक्ष बॅरल तेल आयात झाले. सौदी अरेबियाकडून आयात ३८ टक्क्यांनी घटली, तर अंगोलातून खरेदीत तब्बल २५५ टक्क्यांनी वाढ होऊन ती विक्रमी पातळीवर पोहोचली.
इराककडून आयात ७३ टक्क्यांनी घटून ७.३ दशलक्ष बॅरल झाली, तर यूएईकडून आयात ५९ टक्क्यांनी घटून ६.४ दशलक्ष बॅरलवर आली. ही घट भरून काढण्यासाठी भारताने अंगोला, ओमान, इक्वाडोर, गॅबॉन आणि सुदान येथून खरेदी वाढवली.
दरम्यान, येमेनमधील हूथी बंडखोरांनी पश्चिम आशियातील संघर्ष (Conflicts in West Asia) सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच इस्रायलवर हल्ला केला, ज्यामुळे बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही सामुद्रधुनी लाल समुद्राला अदनच्या आखाताशी आणि हिंद महासागराशी जोडते. येथे अडथळा निर्माण झाल्यास वाहतूक खर्च आणि भारताचा आयात खर्च वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
