येमेनच्या पश्चिम किनाऱ्याजवळ लाल समुद्रात मंगळवारी 'एमएसव्ही फैज नूरे औलिया' या भारतीय मालवाहू जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भारतानं केली आहे.
या जहाजावर १३ भारतीय आणि एक येमेनी नागरिक होता. या घटनेनंतर येमेनी लष्कराने सर्व १४ खलाशांची सुखरूप सुटका केली असून त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.(Indian cargo ship attack)
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केले निवेदन
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने देखील याबाबतचे निवेदन जारी केले आहे. रियाधमधील भारतीय दूतावास या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि खलाशांच्या सुरक्षिततेसाठी येमेनी प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधत आहे. भारतीय जहाजांवरील हल्ला चिंतेची बाब असल्याचे म्हणत व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे थांबवण्याचे आवाहन भारताने केले आहे.(Indian cargo ship attack)
केंद्रीय बंदर आणि जलमार्ग मंत्री सोनोवाल यांच्याकडून निषेध
केंद्रीय बंदर आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हल्ल्याचा निषेध करणारी एक पोस्ट एक्स या सोशल मीडिया हँडलवर लिहली आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे भारतीय जहाज बुडाले. भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी आणि बचावलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक मदत पुरवण्यासाठी सर्व तातडीने पावले उचलण्याचे निर्देश डायरेक्टर जनरल मॅरिटाईम एडमिनिस्ट्रेशनला दिले आहेत, असे सोनोवाल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. “या हल्ल्याचा भारत तीव्र निषेध करतो. आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सर्व १४ खलाशांची येमेनी तटरक्षक दलाने सुखरूप सुटका केली असून त्यांना मोखा बंदरात आणले आहे,” असे सोनोवाल पुढे म्हणाले.(Indian cargo ship attack)
येमेनच्या पश्चिम किनाऱ्याजवळ क्षेपणास्त्र हल्ला
समोर आलेल्या माहितीनुसार, हुदैदह या बंदर शहराच्या दक्षिणेस सुमारे १३ नॉटिकल अंतरावर या जहाजावर हल्ला झाला. हे बंदर हुतींच्या ताब्यात आहे. येमेनी नॅशनल रेझिस्टन्स फोर्सच्या ‘गार्ड्स ऑफ रिपब्लिक’ने याबाबतचे निवेदन जारी केले आहे. क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानंतर तटरक्षक दल आणि नौदल युनिट्सने खलाशांच्या सुटकेसाठी संयुक्त मोहीम राबवली.(Indian cargo ship attack)

