Bhiwandi Building Collapse: भिवंडीमध्ये गुरुवारी मध्यरात्री चार मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इमारत दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, जबाबदार व्यक्तींविरुद्ध तात्काळ एफआयआर दाखल करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
गुरुवारी रात्री उशिरा भिवंडीतील बालाजी नगर, गंगारामवाडी येथील चार मजली कोहिनूर अपार्टमेंटचा काही भाग कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाल्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली दोन ते तीन जण अडकल्याच्या भीतीने बचावकार्य अजूनही सुरू आहे.
–Spain Border Crisis : स्पेनच्या सीमेवर घुसखोरी आणि भीषण चेंगराचेंगरी; १८ जणांचा मृत्यू, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर पाचारण
‘एक्स’ समाज माध्यमावर या घटनेसंदर्भात पोस्ट करून मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्ते केले आहे. प्राण गमावलेल्या व्यक्तिंविषयी श्रद्धांजली वाहिली आहे. “भिवंडी इमारत दुर्घटनेतील जीवितहानी अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. महापालिका आयुक्तांना जबाबदार असलेल्यांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून, ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो,” अशा भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी-निझामपूर महानगरपालिकेने यापूर्वीच ही इमारत धोकादायक घोषित केली होती आणि तिच्या स्थितीबाबत नोटिसा बजावल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार, रात्री सुमारे साडेअकरा वाजता इमारत अचानक कोसळली, तेव्हा तिच्या खांबांच्या दुरुस्तीचे काम सुरू होते.
सुरुवातीला बचाव कार्याला आव्हानांचा सामना करावा लागला, कारण अरुंद रस्त्यामुळे अवजड यंत्रसामग्री घटनास्थळी पोहोचू शकत नव्हती. नंतर एनडीआरएफ आणि टीडीआरएफची पथके दाखल झाली आणि बचाव पथकाला मार्ग मोकळा करून देण्यासाठी कोसळलेल्या इमारतीजवळील एक जुनी चाळ जेसीबी मशीनच्या साहाय्याने पाडण्यात आली.
रहिवाशांनी सांगितले की, इमारत कोसळण्याच्या काही क्षणांपूर्वी अनेक कुटुंबे बाहेर पडण्यात यशस्वी झाली. अरविंद गुप्ता आणि त्यांची पत्नी इमारतीतून बाहेर धावले, तर त्यांची मुलगी कोमल काही काळासाठी ढिगाऱ्याखाली अडकली होती, पण नंतर तिने स्वतःला वाचवले. तिने असा आरोप केला की, ही घटना घडली तेव्हा खांबांच्या दुरुस्तीचे काम सुरू होते.
आपत्कालीन बचावकार्यात स्थानिक तरुणांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. आपत्कालीन प्रतिसाद पथके घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी त्यांनी अनेक रहिवाशांना बाहेर पडण्यास मदत केली आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन व्यक्तींना बाहेर काढले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, राज्य सरकार पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करत आहे. तसेच एनडीआरएफची पथके, अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक प्रशासन अजूनही अडकलेल्या लोकांना शोधून बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू ठेवत आहेत.
हेही पाहा –

