प्रतिनिधी
Uday Samant : कोकणातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले असून, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे वाढते दौरे अनेक राजकीय चर्चांना खतपाणी घालत आहेत.
शासकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने सुरू असलेल्या या दौऱ्यांमागे आगामी निवडणुकांची रणनीती दडली आहे का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
गेल्या काही दिवसांत रायगड आणि रत्नागिरीमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले. मात्र, या शासकीय कार्यक्रमांनंतर भाजपने दोन्ही जिल्ह्यांत स्वतंत्र कार्यकर्ता मेळावे घेऊन संघटन बळकट करण्यावर भर दिला. त्यामुळे निवडणुकीपूर्वी पक्षाची ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे.
रत्नागिरीतील कार्यकर्ता मेळाव्यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती सरकारच्या कामांचा आढावा घेत कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय होण्याचे आवाहन केले. सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याबरोबरच नागरिकांच्या समस्या गोळा करून त्या शासनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या संघटनात्मक कामाचेही बावनकुळे यांनी कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली कोकणात भाजप आणखी मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मनसेतून भाजपमध्ये दाखल झालेले खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनीही महत्त्वाचे राजकीय संकेत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कोकणावर विशेष लक्ष असल्यामुळेच पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री सातत्याने या भागाचे दौरे करत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात कोकणातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपची ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचाही दावा त्यांनी केला.
यापूर्वी प्रवीण दरेकर, आशीष शेलार यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी रत्नागिरी दौरे केले होते. त्यानंतर बावनकुळे यांच्या दौऱ्याने या हालचालींना आणखी वेग मिळाला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील अधिक जागांवर भाजप दावा करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
विशेष म्हणजे, या सर्व हालचाली उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रभावक्षेत्रात होत असल्याने महायुतीतील भविष्यातील जागावाटप, स्थानिक राजकीय समीकरणे आणि कोकणातील सत्तासंतुलन याबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे या वाढत्या दौऱ्यांमागे केवळ संघटन बळकटीकरण आहे की आगामी राजकीय रणनीतीची सुरुवात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –

