प्रतिनिधी
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या प्रचंड यशानंतर आता विद्यार्थिनींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेने महिला सक्षमीकरणाच्या पाऊलखुणा जपत शहरातील शालेय मुलींसाठी ‘लाडकी विद्यार्थिनी योजना'(Ladki Vidyarthini Yojana)सुरू करण्याची घोषणा केली असून, यामुळे गोरगरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाला मोठी उभारी मिळणार आहे.
( – Rickshaw License: रिक्षा चालवायचीय? मग मराठी बोलता आलंच पाहिजे )
इयत्ता ७ वी ते १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र विद्यार्थिनीला दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही रक्कम ‘थेट लाभ हस्तांतरण’ (DBT) द्वारे थेट विद्यार्थिनींच्या बँक खात्यात जमा होईल. स्वर्गीय ज्योती पप्पू कलानी यांच्या नावाने ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली जाणार असून, यामुळे पालकांवरील शैक्षणिक खर्चाचा भार हलका होण्यास मदत होईल.(Ladki Vidyarthini Yojana)
आर्थिक विवंचनेमुळे अनेकदा मुलींचे शिक्षण अर्धवट सुटते किंवा शिक्षणातील गळतीचे प्रमाण वाढते. हीच गळती रोखणे आणि मुलींना स्वबळावर शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देणे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. महायुती सरकारने राज्यस्तरावर राबवलेल्या लाडकी बहीण योजनेचा अडीच कोटी महिलांना लाभ मिळाला असून, आता त्याच धर्तीवर स्थानिक पातळीवर उल्हासनगर पालिकेने घेतलेला हा निर्णय इतर शहरांसाठीही पथदर्शक ठरणार आहे. ७ वी ते १२ वी या अत्यंत महत्त्वाच्या शैक्षणिक टप्प्यावर मिळणारी ही आर्थिक मदत विद्यार्थिनींसाठी ‘आधारवड’ ठरणार असून, शहरात या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे.(Ladki Vidyarthini Yojana)
हेही पहा –
