Lashkar-e-Taiba: गेल्या काही वर्षांत भारतीय एजंट्सनी पाकिस्तानात घुसखोरी करून ३०हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले आहे. पाकिस्तान वारंवार भारताच्या विरोधात कारस्थाने रचतो, परंतु अनेकदा त्यात अपयशी ठरतो, असा दावा लष्कर-ए-तोएबाशी संबंधित एका सदस्याने केला आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने विविध आघाड्यांवर कठोर भूमिका घेतली, ज्यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली. आता, लष्करच्या एका दहशतवाद्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पाकिस्तानची हतबलता पुन्हा एकदा उघड झाली आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरत आहे, ज्यामध्ये ‘रिझवान हनीफ’ नावाचा लष्करचा सदस्य भाषण करताना दिसत आहे. त्याने दावा केला की, गेल्या काही वर्षांत भारतीय एजंट्सनी पाकिस्तानात घुसून ३० हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले आहे. तो म्हणाला, “भारताच्या गुप्तचर संस्थांनी त्यांचे एजंट्स पाठवले आहेत. अलीकडच्या काळात अशा ३० हून अधिक घटना घडल्या आहेत. आमचा एकमेव ‘गुन्हा’ हा आहे की आम्ही ‘ला इलाहा इल्लल्लाह’ (अल्लाहशिवाय दुसरा कोणीही देव नाही) यावर विश्वास ठेवतो; आम्ही राम आणि घनश्याम यांच्यावर विश्वास ठेवत नाही.”
अननोन गनमन…
गेल्या काही महिन्यांपासून, जेव्हा जेव्हा पाकिस्तानात एखादा दहशतवादी मारला जायचा, तेव्हा सोशल मीडियावर ‘अननोन गनमन’ (अज्ञात बंदूकधारी) हा हॅशटॅग ट्रेंड व्हायचा. लष्करचा दहशतवादी हनीफ यानेही याचा उल्लेख केला आणि सांगितले की, पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये “आमच्या बांधवांना” ठार मारण्यात आले. त्याने विशेषतः पेशावर, कराची, रावळपिंडी, मुझफ्फराबाद आणि रावालाकोट या शहरांचा उल्लेख केला.

