कल्याण, प्रतिनिधी
Monsoon Tourism Restrictions Maharashtra पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होणाऱ्या ग्रामीण भागातील भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर ४ जुलैपासून ३ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
हा आदेश ग्रामीण पोलिसांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६८ अन्वये जारी केला आहे. (Monsoon Tourism Restrictions Maharashtra)
ग्रामीण परिसरामधुर पावसाळ्यात धबधबे, तलाव, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि धरणांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. तसेच काही ठिकाणी महिलांची छेडछाड, टवाळी आणि असभ्य वर्तनाच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गणेशपुरीतील वांबेघरी नदी, उतनगाव धबधबा, शहापूरमधील भातसा, तानसा, वैतरणा धरण, माहूली गड, पायथा, सापगाव नदी किनारा आणि कळंबे नदी, कसाऱ्यातील कसारा घाट धबधबे, अशोक धबधबा, किन्हवलीतील आजा पर्वत, जांभा धरण, चोंढा धरण परिसर आणि हनुमान धबधबा (चोंढा), मुरबाडमधील सिद्धगड, डोंगरगाव, सोनाळे, हरिश्चंद्रगड, बारवी धरण, पडाळे धरण, गोरखगड, सुभेदार धबधबा खिचले, खोपोलीवली धबधबा, संगमेश्वर संगम, कल्याणातील खडवली व टिटवाळा नदी परिसर, काळा, पावशेपाडा, गणेश घाट, कुळगावातील कोर्डशेर धबधबा, बारवी नदी, आंबेशिव नदी, चंदेरी गड, भोज, दहीवली, चांप, आसनोली नदी, पडघ्यातील भातसा नदी, खडवली (सोरगाव हद्दी), वाशिंदमधील दहागाव (कालगाव) आणि टोकावड्यातील माळशेज घाट व नाणेघाट या ठिकाणी पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यात जीवितहानी टाळण्यासाठी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी या कालावधीत वरील ठिकाणी जाणे टाळावे. आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. परिणामी यंदाच्या वर्षी ३ सप्टेंबरपर्यंत धबधब्यांसह धरणे आणि नदीकाठावर पर्यटकांची गर्दी दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Monsoon Tourism Restrictions Maharashtra)
मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्यामुळे रायत्याचा पूल पाण्याखाली; वाहतूक बंद
गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील रायत्याजवळ असलेला खालचा जुना पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून त्या ठिकाणची वाहतूक प्रशासनाने तातडीने बंद केली आहे. नदीचे पाणी पुलाच्या कठड्याच्या वरपर्यंत आले आहे. पुलावर पाणी वाहत असल्याने अपघात होऊ नये म्हणून प्रशासनाने धोक्याची पट्टी लावून परिसर सील केला आहे. समोर नवीन उंच पूल असून त्या पुलावरूनच सध्या वाहतूक वळविण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या सखल भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठांनी नदीपात्राजवळ जाऊ नये, तसेच फोटो काढण्याच्या नादात जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. पाणी आणखी वाढल्यास बचाव पथके तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Monsoon Tourism Restrictions Maharashtra)
