पश्चिम उपनगरातील रहिवाशांसाठी आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. पश्चिम रेल्वेने हाती घेतलेल्या वसई-नायगाव-जुचंद्र या जोडमार्गाच्या (Chord Line) प्रकल्पाला आता गती मिळाली आहे.
सुमारे १७६ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची कोकण (Konkan Railway) मार्गिका थेट जोडली जाणार आहे. यामुळे प्रवाशांना आता दादर किंवा वसई रोड स्थानकात न जाता थेट कोकणाच्या दिशेने प्रवास करणे शक्य होणार असून, वेळेची मोठी बचत होणार आहे. (Mumbai Konkan Rail Bypass)
प्रवासाचा वेळ वाचणार आणि मार्ग सुकर होणार या नव्या जोडमार्गाची एकूण लांबी सुमारे साडेसात किलोमीटर इतकी असणार आहे. सध्या मुंबई सेंट्रल किंवा दादरवरून सुटणाऱ्या दक्षिणेकडील गाड्यांना वसई रोड स्थानकात इंजिनची दिशा बदलावी लागते, ज्यामध्ये किमान अर्धा तास निघून जातो. या वसई बायपास प्रकल्पामुळे गाड्या वसई स्थानकावर न थांबता थेट जुचंद्रमार्गे कोकण रेल्वेच्या मार्गावर वळवता येतील. यामुळे प्रवाशांचा प्रवासातील तब्बल ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. (Mumbai Konkan Rail Bypass)
भूसंपादन आणि पर्यावरणाच्या परवानग्यांचे काम सुरूया प्रकल्पासाठी एकूण आठ हेक्टरपेक्षा जास्त जमिनीची आवश्यकता आहे. यातील काही भाग खारफुटीचा (Mangroves) आणि मिठागरांचा असल्याने प्रशासनाकडून वन विभागाकडे मंजुरीसाठी विशेष अर्ज सादर करण्यात आला आहे. जमिनीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून लवकरच प्रत्यक्ष बांधकामाचा मार्ग मोकळा होणार आहे. जोगेश्वरी येथे उभारले जाणारे नवीन टर्मिनस २०२७ मध्ये आणि ही जोड मार्गिका २०२८-२९ पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, ज्यामुळे भविष्यात कोकणात जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवणे शक्य होईल.
हेही पहा –

