Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारताची परराष्ट्र नीती अमेरिकेच्या दबावाखाली - राहुल गांधी

भारताची परराष्ट्र नीती अमेरिकेच्या दबावाखाली - राहुल गांधी

वी दिल्ली , 04 जून (हिं.स.)।काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सिमकनी येथे आयोजित काँग्रेसच्या जाहीर सभेला खराब हवामानामुळे राहुल गांधी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत.

मात्र, त्यांनी दिल्लीहून दूरध्वनीद्वारे सभेला संबोधित केले. आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी देशाची परराष्ट्र नीती, कृषी क्षेत्र आणि शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

गुरुवारी झालेल्या या सभेत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आरोप केला की, नरेंद्र मोदी सरकारने अमेरिकेसमोर पूर्णपणे शरणागती पत्करली आहे. ते म्हणाले, "आज आपल्या देशाची परराष्ट्र नीती अमेरिकेच्या प्रभावाखाली आहे. अमेरिका भारतावर दबाव टाकत आहे आणि भारताने कोणत्या देशाकडून तेल खरेदी करावे आणि कोणत्या देशाकडून करू नये, हेही तीच ठरवत आहे."

परराष्ट्र धोरणासोबतच काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारच्या अंतर्गत धोरणांवरही तीव्र टीका केली. त्यांनी म्हटले की, केंद्राच्या सध्याच्या धोरणांमुळे देशातील शिक्षण व्यवस्था आणि कृषी क्षेत्र गंभीर संकटाचा सामना करत आहेत. सरकारची धोरणे सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून, काही मोजक्या लोकांना लाभ मिळावा यासाठी आखली जात आहेत.

वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, हा कर चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आल्यामुळे देशातील लहान उद्योग आणि व्यवसाय बंद पडले आहेत.त्यामुळे रोजगाराच्या संधी कमी झाल्या असून व्यापार काही मोठ्या उद्योगपतींच्याच हातात केंद्रित झाला आहे.भाषणाच्या शेवटी राहुल गांधी यांनी अल्मोडा येथील नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांना निराश न होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, ते लवकरच पुन्हा त्यांच्या भेटीस येतील. त्यानंतर त्यांनी आपले भाषण समाप्त केले.

सभास्थळी उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या राज्य प्रभारी कुमारी शैलजा यांनी खराब हवामानामुळे राहुल गांधी यांचा दौरा रद्द झाल्याची अधिकृत घोषणा केली आणि त्यांनी दूरध्वनीद्वारे सभेशी संवाद साधल्याची माहिती दिली. यावेळी प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल, माजी मुख्यमंत्री हरीश रावत, आमदार सुमित हृदयेश, मनोज तिवारी, यशपाल आर्य, प्रीतम सिंह, भुवन कापडी, हरीश धामी आदी नेते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi