Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ब्रिटनने भारताकडून शिकावे, एनएचएस अध्यक्षांकडून भारतीय आरोग्यव्यवस्थेचे कौतुक

ब्रिटनने भारताकडून शिकावे, एनएचएस अध्यक्षांकडून भारतीय आरोग्यव्यवस्थेचे कौतुक

वी दिल्ली , 03 सप्टेंबर (हिं.स.)।आरोग्यसेवा व्यवस्थेच्या क्षेत्रात भारत आता जगासमोर एक आदर्श निर्माण करत आहे. इंग्लंडच्या एनएचएसच्या अध्यक्षा डॉ. पेनी डॅश यांनी ब्रिटनने भारताच्या आरोग्यसेवा व्यवस्थेकडून शिकायला हवे, असे म्हटले आहे.

डॉ. पेनी डॅश यांच्या मते, आरोग्यसेवा व्यवस्थेच्या क्षेत्रात भारत लवकरच असा जागतिक मापदंड निर्माण करू शकतो, ज्याचा अवलंब इतर देशांनाही करावासा वाटेल.

जागतिक आरोग्यसेवा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. डॅश यांनी एका पॉडकास्टमध्ये भारताचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, "भारत… वा! भारत खरोखरच उत्तम काम करत आहे. मला वाटते की आरोग्यसेवा पुरवण्याच्या बाबतीत भारत कदाचित जगासाठी एक आदर्श ठरेल."

डॉ. पेनी डॅश पुढे म्हणाल्या, "इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच भारताला तंत्रज्ञानाची आवड आहे आणि आरोग्यसेवेतही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे." त्या म्हणाल्या, "होय, अमेरिकेतही काही उत्कृष्ट काम होत आहे. मात्र, भारत खरोखरच उल्लेखनीय कामगिरी करत आहे. भारत ज्या पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करत आहे, त्या पद्धतींचा आपण किंवा अमेरिका अजून केवळ विचारच करू शकतो."

पेनी डॅश यांनी पुढे सांगितले, "आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि विशेष बाब म्हणजे भारत अशा पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करत आहे, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीसाठी आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि सहज उपलब्ध होत आहे. याबाबत भारत अत्यंत गंभीर आहे."

भारतामधील तंत्रज्ञान कंपन्यांचे संस्थापक, तसेच आरोग्यसेवा देणारे व्यवस्थापक आणि डॉक्टरही याच दृष्टिकोनातून विचार करत असल्याचे डॅश यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याच्या भारताच्या क्षमतेचेही डॉ. डॅश यांनी कौतुक केले. त्यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा एनएचएस वाढती आणि वृद्ध होत चाललेली लोकसंख्या हाताळण्यासाठी उत्पादकता वाढवण्याबरोबरच आरोग्यसेवा व्यवस्थेचे डिजिटलायझेशन करण्याचा प्रयत्न करत आहे.

आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या माध्यमातून भारताने जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक डिजिटल आरोग्य व्यवस्थांपैकी एक उभारली आहे. तसेच, 'ई-संजीवनी' या डिजिटल आरोग्यसेवा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कोट्यवधी टेलिकन्सल्टेशन म्हणजेच डॉक्टरांचा ऑनलाइन सल्ला घेणे सुलभ झाले आहे. दरम्यान, भारतात आजारांचे निदान करण्यासाठी तसेच मलेरिया आणि डेंग्यूच्या स्थानिक उद्रेकाचा अंदाज घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय चा वापर केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi