Dailyhunt

जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्नशील - बाळासाहेब थोरात

मुंबई, ३ जून, (हिं.स) निसर्ग चक्रीवादळ रायगडमधून कर्जतकडे सरकले आहे. आतापर्यंत सर्वाधिक फटका मुरुड आणि श्रीवर्धनाला बसला आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तातडीने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून पडली आहेत, परिणामी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी तारा तुटल्या, विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. प्रशासन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

ते म्हणाले की, मुंबईला असलेला चक्रीवादळाचा धोका कमी झालेला असला तरी पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.

हे चक्रीवादळ केंद्रबिंदू पासून सरासरी दोनशे किलोमीटर पर्यंत परिणाम करते. निसर्ग चक्रीवादळाची दिशा बघता पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासन दक्ष आहे. नागरिकांनीही काळजी घ्यावी, प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे.


हिंदुस्थान समाचार

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi