Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
काॅंग्रेसने उमेदवार न दिल्याने विधान परिषद निवडणूक बिनविरोध

काॅंग्रेसने उमेदवार न दिल्याने विधान परिषद निवडणूक बिनविरोध

मुंबई, 30 एप्रिल (हिं.स.) - येत्या 12 मे रोजी विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र, ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत या निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याची वेळ होती.

त्यानुसार, भाजपचे ५, शिवसेना शिंदे गटाचे २, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महाविकास आघाडीचा प्रत्येकी एक उमेदवार अशा नऊ उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत. कोणत्याही पक्षाने अतिरिक्त उमेदवार न दिल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे.

विधान परिषदेसाठी एकूण 10 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला असला तरी त्यांना 10 आमदारांची सूचक म्हणून सही नसल्याने या संबंधित अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जातील.

पक्ष / आघाडी निहाय उमेदवार

भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार आणि प्रज्ञा सातव (पोटनिवडणूक)

शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू

राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून (अजित पवार गट) झिशान सिद्दीकी

शिवसेना ठाकरे गटाकडून (मविआ) अंबादास दानवे

महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत आपला फॉर्म भरला.

ठाकरेंच्या निर्णयाला समर्थन - हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस विधान परिषदेसाठी अर्ज भरणार नाही. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय मविआचा निर्णय म्हणून आम्ही समर्थन करत आहोत. मविआचे उमेदवार अंबादास दानवेच असतील, अशी घोषणा काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. मविआ म्हणून आम्ही भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षासोबत एकत्र लढा देणार आहे. लोकसभा निवडणुकीला मविआला चांगले यश मिळाले होते. यापुढेही आम्ही एकत्रच लढा देऊ. आमच्यामध्ये कोणतीही नाराजी नाही, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi