Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा; गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - इंदुरीकर

कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा; गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - इंदुरीकर

सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगमाचा उत्साहात समारोप

नाशिक, 30 ऑगस्ट (हिं.स.)। : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने गोदावरीला पवित्र महत्त्व प्राप्त झाले, अशी श्रद्धा आहे.

देव-दानवांच्या बारा दिवसांच्या युद्धाचे प्रतीकात्मक नाते बारा वर्षांशी जोडले गेले आणि त्यातून सिंहस्थ कुंभमेळ्याची बारा वर्षांची परंपरा निर्माण झाली. कुंभ हा कोणत्याही एका संप्रदायाचा नसून संपूर्ण मानवजातीचा आहे. येथे वय, जात किंवा इतर कोणताही भेद न पाहता केवळ श्रद्धेला महत्त्व दिले जाते. त्यामुळे गोदावरीत प्लास्टिकच्या पिशव्या किंवा कचरा टाकू नका, नदी स्वच्छ ठेवा तसेच शेतात आणि परिसरात किमान एक झाड लावा, असे आवाहन प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केले.

ठक्कर डोम येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगमाचा रविवारी (दि. ३०) उत्साहात समारोप झाला. यावेळी विभागीय आयुक्त प्रविण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.

इंदुरीकर महाराज म्हणाले की, शरीरात पंचप्राण असतात, त्याचप्रमाणे संतसंप्रदाय हा समाजाचा प्राण आहे. आज माणूस पैशावर अधिक प्रेम करू लागला आहे; मात्र पैसा हीच माणसाची उंची नसून अध्ययन, संस्कार, संतविचार आणि कर्तव्यभावनेतून व्यक्तिमत्त्वाची खरी उंची निर्माण होते. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई यांच्या कार्याचा उल्लेख करताना संत निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते, असे त्यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर हे श्रेष्ठ तीर्थ असून श्री निवृत्तीनाथांच्या चरणी सर्व तीर्थांचे महत्त्व सामावले आहे, असेही ते म्हणाले.

ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांच्या अलौकिक कार्याचा संदर्भ देत ज्ञानेश्वरीतील सुमारे नऊ हजार ओव्या आणि लाखो शब्दांमधून संतविचारांची व्यापकता दिसून येते, असे त्यांनी नमूद केले. ज्ञानेश्वरांच्या कार्याचा पाया निवृत्तीनाथ असून नामदेव महाराजांनी त्यावर कळस चढविला, असे सांगत त्यांनी संतपरंपरेचे महत्त्व स्पष्ट केले. काकड्याच्या मालिकांतील अभंग, संतवाङ्मय आणि त्यातील जीवनदृष्टी यांचा संदर्भ देत आजच्या पिढीने संतविचार समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

: आई-वडील, संत, गुरू, ग्रंथ यांच्याप्रती कृतज्ञता ठेवा

सर्वांनी आई-वडील, संत, गुरू, ग्रंथ आणि भगवंत यांच्याप्रती कृतज्ञता ठेवली पाहिजे, असे आवाहन इंदुरीकर महाराजांनी केले. घरात प्रेम आणि संस्कारांचे गाणे कायम राहिले पाहिजे. सोन्याचा दागिना सोन्याला, कापड धाग्याला आणि गूळ गोडीला सोडत नाही; त्याचप्रमाणे आई-वडील, संत आणि कर्तव्याची साथ माणसाने कधीही सोडू नये, असा संदेश त्यांनी दिला.

चौकट :

निवृत्ती महाराज देशमुख उवाच...

आई, वडील किंवा नातेवाईकांच्या मृत्यूनंतर त्यांची राख गोदावरीत टाकू नका; त्याऐवजी त्यांच्या स्मरणार्थ वृक्ष लावा.

प्रत्येकाने गोदावरी स्वच्छ ठेवण्याबरोबरच आपले मनही निर्मळ करावे.

कुंभमेळा यशस्वी करणे ही जशी सरकारची जबाबदारी आहे, तशीच ती आपल्या सर्वांचीही आहे.

सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी राजकारण बाजूला ठेवावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi