Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तन्वी शर्माने रचला इतिहास; तैपेई ओपन जिंकणारी सर्वात तरुण बॅडमिंटनपटू

तन्वी शर्माने रचला इतिहास; तैपेई ओपन जिंकणारी सर्वात तरुण बॅडमिंटनपटू

तैपेई, 02 ऑगस्ट (हिं.स.) भारताची युवा बॅडमिंटन स्टार तन्वी शर्माने तैपेई ओपन सुपर-३०० स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. पंजाबच्या या १७ वर्षीय बॅडमिंटनपटूने अंतिम सामन्यात व्हिएतनामच्या सहाव्या मानांकित थुई लिन गुयेनचा २१-१६, २१-१६ असा पराभव करून आपल्या कारकिर्दीतील पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावले.

हा सामना केवळ ३६ मिनिटे चालला.

२००८ ची विजेती सायना नेहवालनंतर तैपेई ओपन महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी तन्वी ही पहिली भारतीय बॅडमिंंटनपटू ठरली आहे. तिच्या कारकिर्दीतील हे पहिले बीडब्ल्यूएफ सुपर-३०० विजेतेपदही आहे. गेल्या वर्षी, ती यूएस ओपन सुपर-३०० च्या अंतिम फेरीत पोहोचली होती, पण उपविजेती ठरली होती.

या विजयामुळे, तन्वी तैपेई ओपनच्या इतिहासातील कोणत्याही गटातील सर्वात तरुण विजेती ठरली आहे. १७ वर्षे आणि २२२ दिवसांची असताना, तन्वी तैपेई ओपनच्या इतिहासातील सर्वात तरुण विजेती, तसेच स्पर्धेतील सर्वात तरुण अंतिम फेरीतील बॅडमिंटनपटू ठरली. तिने दक्षिण कोरियाचे दिग्गज बॅडमिंटनपटू ली योंग डे यांचा विक्रम मोडला.

पीव्ही सिंधूचे माजी प्रशिक्षक, पार्क ताए-सांग यांची शिष्या असलेल्या तन्वीने सामन्याची सुरुवात शानदार केली. उत्कृष्ट ड्रॉप शॉट्स, क्रॉस-कोर्ट स्मॅशेस आणि उत्तम नेट प्लेच्या जोरावर तिने पहिल्याच गेममध्ये १०-२ अशी आघाडी घेतली. तिच्याकडून काही चुका झाल्या असल्या तरी, तिने लवकरच सावरत पहिला गेम २१-१६ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये व्हिएतनामी खेळाडूने ३-० अशी आघाडी घेतली, पण तन्वीने आपला संयम राखला. उत्कृष्ट बचाव आणि फसवे फटके मारून तिने सातत्याने गुण मिळवले आणि आघाडी कायम ठेवली. अखेरीस, सात मॅच पॉईंट्स मिळवल्यानंतर, तिने चौथ्या संधीवर सामना जिंकला.

१७ वर्षे आणि २२२ दिवसांची असताना, तन्वी तैपेई ओपनच्या इतिहासातील सर्वात तरुण अंतिम फेरीतील खेळाडू देखील ठरली. तिने २००६ मध्ये पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात खेळलेल्या दक्षिण कोरियाचे दिग्गज ली योंग डे यांचा विक्रम मोडला. माजी जागतिक ज्युनियर क्रमांक १ असलेल्या तन्वीने, जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपच्या एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय होण्याचा मान आधीच मिळवला आहे. आशियाई सांघिक चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या संघाचाही ती एक भाग होती. आता, तैपेई ओपन जिंकून, तिने भारतीय बॅडमिंटनचे एक उज्ज्वल भविष्य म्हणून आपले स्थान अधिक पक्के केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi