वर्धा , 30 जुलै (हिं.स.)
४,५३८ गुंतवणूकदारांची १०.१० कोटींची फसवणूक
गुंतवणूकदार आणि ठेवीदारांच्या हितसंरक्षणासाठी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एमपीआयडीअंतर्गत नोंद असलेल्या प्रकरणांमध्ये मोठी कारवाई केली.
बनावट गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तीन कंपन्यांच्या एकूण २७ कोटी ५ लाख ३० हजार १२८ किमतीच्या चल-अचल मालमत्ता जप्त करण्यात आल्या. १६ बँक खाती गोठविण्यात आली आहेत.
पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत रामनगर, वर्धा शहर आणि कारंजा (घाडगे) पोलिस ठाण्यात दाखल तीन गुन्ह्यांचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये एकूण ४ हजार ५३८ गुंतवणूकदारांची १० कोटी १० लाख ३४ हजार ८७१ रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रामनगर पोलिस ठाण्यातील प्रकरणात गरिमा रिअल इस्टेट अॅण्ड अलाइड प्रा. लि., गरिमा होम्स अॅण्ड फार्म हाऊस प्रा. लि. तसेच साथी मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्यावर ६ कोटी ४९ लाख ४४ हजार ३५३ रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे. या प्रकरणात २ हजार ८२५ गुंतवणूकदार प्रभावित झाले असून १३ बँक खाती गोठविण्यात आली आहेत. तसेच ६९ लाख ९३ हजार ५९८ किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. वर्धा शहर पोलिस ठाण्यातील प्रकरणात सयोग बिल्डर्स अॅण्ड रिअल इस्टेट प्रा. लि., नांदेड या कंपनीविरुद्ध १ कोटी ११ लाख ६२ हजार २८६ रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. या प्रकरणात १ हजार ८३ गुंतवणूकदार प्रभावित झाले असून कंपनीची ५२ लाख ७३ हजार २२२ किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कारंजा (घाडगे) पोलिस ठाण्यातील प्रकरणात जेएसव्ही डेव्हलपर्स इंडिया आणि जय विनायक बिल्डकॉर्प लिमिटेड यांच्यावर २ कोटी ४९ लाख २८ हजार २४० रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे. या प्रकरणात ६३० गुंतवणूकदार प्रभावित झाले आहेत. पोलिसांनी तीन बँक खाती गोठवून कंपनीची सुमारे २५ कोटी ८२ लाख ६३ हजार ३१८ किमतीची मालमत्ता जप्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी
