भारतात अनेक वंचित घटकांना शिक्षण देताना ब्रिटिश राज्यव्यवस्थेतून उदयाला आलेल्या शिक्षण व्यवस्थेतील उणिवा समोर येतात. परंतु, त्यावर वर्षानुवर्षे उलटली तरी मार्ग काढले जात नाहीत. काटेमुंढरीतील गुरुजींचे मोठेपण यात आहे, की यावर ते योग्य असा मार्ग शोधतात.
ते कल्पक आणि सर्जनशील वृत्ती दाखवतात. नव्या कल्पनांचे स्वागत करतात. तेथील समाजाच्या गरजा विचारात घेऊन शिक्षणातील ठोकळेबाजपणा बाजूला सारतात. गांधीजींची शिक्षणविषयक विचारप्रणाली देशाच्या गरजांना समोर ठेऊनच साकारली आहे. त्यादृष्टीने विचार करता काटेमुंढरीचे मास्तर वेळोवेळी घेत असलेले निर्णय गांधींच्या विचाराला जोडून घेणेच आहे.
गांधीजींच्या शिक्षण विचारात शरीर, मन आणि आत्मा याबाबतचे उत्तमातले उत्तम संचित शिक्षणाकरवी प्रफुल्लीत केले जाते. काटेमुंढरीच्या शाळेत मुलांबाबत असेच घडते. काटेमुढंरीतील मुलांवर अगोदरच्या मास्तराकरवी शिक्षणाबद्दल तयार झालेली नकारात्मकता दूर करताना नवे गुरुजी मुलांचे मन प्रफुल्लीत करण्यासाठीचे नाना प्रयोग करतात. ते त्याच्या मन-आत्म्याला आवाहन करत राहतात.
गांधीजी शिक्षणाची व्याख्या 'जीवनासाठी जीवनातून शिक्षण' अशी करतात. तर विनोबा 'जीवन हेच शिक्षण' असे म्हणतात. या व्याख्यांचा प्रत्यय गुरुजींना आदिवासी मुलांमध्ये येतो. जगण्यासाठी आवश्यक ते शिक्षण या मुलांनी घेतलेलेच असते. त्यामुळे गुरुजी अनेक वेळा त्यांच्या समजुतदारपणामुळे आणि त्यांच्याजवळ असलेल्या पारंपरिक ज्ञानामुळे स्तिमित होतात.
गोना गुरुजींची 'नयी तालीम'मधून हे पुस्तक शिक्षणविषयक दृष्टी विकसित करण्याची सुरुवात ठरू शकते.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करामराठी विचारांची डिजिटल नगरी

