आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
आजपासून ते शुक्रवार २० मार्च पर्यंतच्या चार दिवसात कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विजा, वारा-वावधन, गडगडाटासह दुपारनंतर उष्णता संवहनी प्रक्रियेतून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
विशेषतः गुढी पाडव्याला,आदल्या व दुसऱ्या दिवशी म्हणजे १८, १९, २० मार्च (बुधवार, गुरुवार, शुक्रवार) ह्या तीन दिवशी असल्या वातावरणासह, अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धारशिव, लातूर सह मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर ह्या २० जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक जाणवते.
गारपीटीची शक्यता -
परवा बुधवार १८ मार्च रोजी अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या सहा जिल्ह्यात किरकोळ गारपीटीची शक्यताही नाकारता येत नाही.
उष्णतेची लाट व रात्रीचा उकाडा -
मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे तसेच छत्रपती संभाजीनगर अश्या १३ जिल्ह्यात काहीशी उष्णता व रात्रीच्या उकाडयाची शक्यता जाणवते.
पावसाची शक्यता कश्यामुळे 👇
वारा खंडितता प्रणालीमुळे अरबी व बंगाल उपसागरातून महाराष्ट्रात लोटलेली आर्द्रता व तिचे उष्णता संवहनी प्रक्रियेतून उंचावर जाऊन होणाऱ्या सांद्रीभवनातून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

