जेएनएन, बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राजकीय वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांनी आज अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जामुळे निवडणुकीच्या रिंगणात चुरस वाढली आहे.
सुनेत्रा पवार यांनी समर्थकांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बारामती हा पारंपरिकदृष्ट्या पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जात असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार देत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रपक्षांसोबत चर्चेनंतर काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काही प्रमाणात मतभेद उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
काँग्रेसकडून उमेदवार जाहीर झाल्याने बारामतीत आता तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे मतांचे विभाजन होऊन निवडणुकीचा निकाल अधिकच चुरशीचा होणार आहे.
स्थानिक मुद्दे, विकासकामे आणि पक्षीय समीकरणे यावर आधारित प्रचाराला आता वेग येणार आहे.पुढील काही दिवसांत प्रचारसभांचा धडाका सुरू होणार आहे. बारामतीतील ही निवडणूक राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
सुनेत्रा पवार काय म्हणाल्या…
बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची असून ही निवडणूक माझी वैयक्तिक नसून दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक बारामतीकरांची आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्यक्त केल्या. आज पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा सर्वपक्षीय कार्यकर्ता मेळावा कविवर्य मोरोपंत नाट्यगृह येथे पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
दोन महिन्यापूर्वी आपण सर्वांनी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री, लोकनेते, आदरणीय अजितदादांना गमावले, ही केवळ माझ्या कुटुंबाची नाही, तर संपूर्ण बारामतीची मोठी हानी आहे. दादांचे जाणे बारामतीकरांना पोरके करून गेले. त्यांच्या अनुपस्थितीत ही पहिलीच निवडणूक होत असून त्यांच्या विकासदृष्टीला पुढे नेण्यासाठी आपली साथ अत्यंत आवश्यक आहे अशी हाक बारामतीकरांना घातली.
बारामती शहर हे जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचे दादांचे स्वप्न होते. त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, मात्र त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रामाणिकपणे काम करणे ही, आपली सर्वांची जबाबदारी आहे. संपूर्ण बारामती हे माझे कुटुंब आहे, अशा भावना सुनेत्रा पवार यांनी मेळाव्यात व्यक्त केल्या.
दादांचा जनता दरबार जसा सर्वांसाठी खुला होता, तसाच तो पुढेही कायम ठेवत प्रत्येकाच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करत राहणार असे सांगतानाच शहरात बेकायदेशीर व जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या कोणत्याही गोष्टींना थारा दिला जाणार नाही. दादांनी सुरू केलेले सर्व विकासकामे पूर्णत्वास नेण्याचा माझा निर्धार आहे, असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

