नवी दिल्ली: तेलंगाणातील करीमनगर येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे जन्मदात्या वडिलानेच आपल्या चार वर्षाच्या दोन जुळ्या मुलींची हत्या केली. पोलिसांनी दोन जुळ्या मुलींच्या हत्येप्रकरणी वडील, आजी-आजोबा आणि काका यांना अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, मुलगा व्हावा ही कुटुंबाची इच्छा हेच चार वर्षांच्या जुळ्या मुलींच्या निर्घृण हत्येमागील कारण होते. पोलिसांनी या प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत.
करीमनगर ग्रामीण मंडळ निरीक्षक ए. निरंजन रेड्डी म्हणाले की, जुळ्या मुली कुटुंबावर ओझे बनतील या भीतीने, त्यांचे वडील श्रीशैलम यांनी आपले आई-वडील अशोक आणि लावण्या व धाकटा भाऊ राकेश यांच्यासोबत मिळून मुलींची हत्या करण्याचा कट रचला.
श्रीशैलमला नेहमीच मुलगा हवा होता - पोलीस
पोलिसांनी सांगितले की, श्रीशैलमला मुली कधीच नको होत्या, त्याला नेहमी मुलगाच हवा होता. पत्नी गरोदर असताना, तिच्या पोटात जुळ्या मुली आहेत हे कळल्यावरही त्याने तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला.
आजी-आजोबांना जुळ्या मुलींचा जन्म आवडला नाही-
पोलिसांच्या माहितीनुसार, संगणक ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या पदवीधर श्रीशैलमने 2020 मध्ये मोनिकाशी लग्न केले. 2022 मध्ये जेव्हा या जोडप्याला जुळ्या मुली झाल्या, तेव्हा त्याने त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. त्यांच्या जन्मानंतर तो रुग्णालयात मुलींना भेटायलाही गेला नाही. त्याच्या आई-वडिलांना आणि धाकट्या भावालाही जुळ्या मुलींचा जन्म मान्य नव्हता.
श्रीशैलम मुलींवरून आपल्या पत्नीशी भांडत असे-
पोलिसांनी सांगितले की, श्रीशैलमचे त्याच्या पत्नीसोबत वारंवार भांडण होत असे आणि अखेरीस त्याने तिला तिच्या माहेरी पाठवले. तपासकर्त्यांनी सांगितले की, श्रीशैलमचा असा विश्वास होता की, त्याची अंदाजे २ कोटी रुपयांची मालमत्ता मुलींच्या लग्नासाठी वापरली जाईल.
अधिकाऱ्याने सांगितले, "त्याचा विश्वास होता की त्याच्या मुलींमुळे त्याची सर्व संपत्ती जाईल. त्याचे आई-वडील आणि भाऊ यांचेही तेच मत होते. अखेरीस, त्या चौघांनी मिळून मुलींना संपवण्याचा कट रचला. तपासानुसार, गुन्ह्याच्या चार दिवस आधी कुटुंबाने मुलींच्या हत्येचा कट रचला होता.
शेतात नेऊन मारले -.
3 एप्रिलच्या दुपारी, श्रीशैलमने आपल्या पत्नीला घरी थांबून मटणाची करी बनवायला सांगितले आणि आपण लवकरच परत येऊ असे सांगून मुलींना शेतावर नेले, असा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, त्याने मुद्दाम अशी वेळ निवडली जेव्हा शेतात एकही शेतकरी नव्हता. मुले खेळत असताना, त्याने त्यांना विहिरीजवळ बसवले.
दोन्ही मुलींना विहिरीत ढकलण्यात आले-
श्रीशैलमने प्रथम गीतान्विकाला विहिरीत ढकलले, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दुसरी मुलगी, गीतांशी, पाण्यात धडपडत होती आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत होती.
"जेव्हा त्याच्या लक्षात आले की ती अजून जिवंत आहे, तेव्हा तो स्वतः विहिरीत उतरला आणि स्वतःच्या हातांनी तिला बुडवून ठार मारले. हा एक अत्यंत क्रूर आणि पूर्वनियोजित कट होता," असे सर्कल इन्स्पेक्टर म्हणाले.
मुलींना मारल्यानंतर मदत करण्याचे नाटक केले-
पोलिसांनी सांगितले की, हत्यांनंतर श्रीशैलमने हा एक अपघात आहे असे भासवण्यासाठी बचावकार्याचे नाटक रचले आणि मदतीसाठी आरडाओरडा केला. जेव्हा तिची आई, मोनिका, त्याचा आवाज ऐकून शेतावर पोहोचली, तेव्हा तिला एक मुलगी विहिरीजवळ पडलेली आढळली आणि दुसरी अजूनही बेपत्ता होती. गावकरी आणि शेतकरी घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी दोऱ्यांच्या साहाय्याने मुलींना बाहेर काढले.
निरंजन रेड्डी म्हणाले, "जेव्हा त्याची चौकशी केली गेली, तेव्हा श्रीशैलमने खोटे सांगितले की तो गवत कापायला गेला होता आणि नंतर त्याला कळले की मुली बेपत्ता आहेत. पण त्याचे म्हणणे सतत बदलत असल्यामुळे गावकऱ्यांना संशय आला.
पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली-
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी हस्तक्षेप करण्यापूर्वी संतप्त गावकऱ्यांनी श्रीशैलमला चांगलाच चोप दिला. तपासकर्त्यांनी सांगितले की, त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला आणि त्याने आपल्या आई-वडिलांना व भावाला सांगितले की योजना यशस्वी झाली आहे. त्यानंतर चारही आरोपी गोपाळपूरमधील एका नातेवाईकाच्या घरी लपले, जिथे त्यांना शोधून अटक करण्यात आली.

