जेएनएन, मुंबई: राज्यात एका बाजूला विदर्भात अवकाळी पावसाची कमीजास्त हजेरी पाहायला मिळत असताना दुसऱ्या बाजूला कोकण आणि मुंबईत मात्र उकाड्यानं नागरिक हैराण झाले आहेत. दमट हवामानामुळे घामाच्या धारा कायम असून, किनारपट्टी भागात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे.
दरम्यान, हवामान विभागानं राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा इशारा दिला आहे.
सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, बीड, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमानातही मोठी तफावत पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान 40.8 अंश सेल्सिअसवर पोहोचलं असून विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. पुण्यात 37.2 अंश, साताऱ्यात 38.4 अंश, कोल्हापुरात 36.9 अंश तर नाशिकमध्ये 36.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईत कमाल तापमान 34.1 अंश असलं तरी दमट हवामानामुळे उकाडा अधिक जाणवत आहे. रत्नागिरीतही तापमान 34.5 अंशांवर असून हवेत आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे.
राज्यातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
* पुणे - 37.2 / 22.1
* कोल्हापूर - 36.9 / 23.1
* नाशिक - 36.3 / 21.9
* सातारा - 38.4 / 22
* मुंबई - 34.1 / 26
* रत्नागिरी - 34.5 / 26.5
* नागपूर - 40.8 / 24.2
उत्तर भारतातही हवामानात अचानक बदल होतं आहे. अनेक राज्यांमध्ये तापमानात घसरण झाली असून, वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा प्रभाव दिसून येत आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांत देशातील किमान 10 राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा तडाखा बसू शकतो. त्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
देशाचं सरासरी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरसारख्या पर्वतीय राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून उंच भागांमध्ये हिमवृष्टीही होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
पूर्वोत्तर भारतात आसाम आणि मेघालयमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, दक्षिणेकडील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागातही मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बदलत्या हवामानामुळे देशभरात वातावरणात मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून, पुढील काही दिवस हवामानाचा हा अस्थिर पॅटर्न कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

