जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्याचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने संपूर्ण जिल्हा अक्षरशः होरपळून निघत आहे. या भीषण उष्णतेचा फटका बसून पाचोरा येथील एका ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
आनंदा नथ्थू भोई ( वय ३४, रा. जवाहर हाऊसिंग सोसायटी, बाहेरपुरा) असं मृत तरुणाचं नाव आहे.
नेमकी घटना काय?
पाचोरा येथील जवाहर हाऊसिंग सोसायटीमधील रहिवासी आनंदा भोई हे तरुण छत्रपती शिवाजी महाराज चौकात फळविक्रीचा व्यवसाय करत होते. २९ रोजी दुपारी उन्हाच्या तीव्र झळा बसत असताना, फळविक्री करत असतानाच त्यांना अचानक तीव्र भोवळ (चक्कर) आली आणि ते जमिनीवर कोसळले.
उपस्थितांनी त्यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून ‘मृत’ घोषित केले. प्राथमिक तपासणीत हा मृत्यू उष्माघाताने (Heatstroke) झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे, तरीही शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान उष्माघातापासून बचाव साठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी दुपारचे वेळी बाहेर पडू नये ,असे आव्हान जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन तपासणी करावी अशा देखील सूचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या आहेत

