Dailyhunt
फेकरी टोलनाक्यावरील वसुली थांबवा : राष्ट्रवादीची मागणी

फेकरी टोलनाक्यावरील वसुली थांबवा : राष्ट्रवादीची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कामे अपूर्ण असताना देखील गेल्या काही दिवसांपासून टोल सुरू करण्यात आला. यामुळे येथील नागरिकांना दोन टोल भरावा लागत आहे.

फेकरीचा टोल त्वरित बंद करावा किंवा परिसरातील वाहनांना टोल मुक्त करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर. पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्पप्रमुख चंद्रकांत सिन्हा यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. वरणगाव ते जळगाव दरम्यान तीन रेल्वे उड्डाणपूल असून त्या सर्व पुलांचे काम पूर्ण झालेले नाही. महामार्गावरून खाली उतरताना सर्व्हिस रोडचे काम अपूर्ण असून जागोजागी पाणी साचले आहे. परिसरातील नागरिकांना दोन ठिकाणी टोल भरावा लागत आहे. नशिराबाद येथील टोल चिखली ते जळगाव दरम्यान आहे. वरणगाव ते जळगाव हे अंतर अवघे ४० कि.मी. असून त्यापैकी ३० कि.मी नहीचा रस्ता नागरिक वापरतात. या रस्त्यावर आधीपासूनच फेकरी येथील टोल आहे. येथील वाहनधारकांना जळगावला जाताना दोन नाक्यांवर टोल द्यावा लागताे. दोन्ही टोल मधील अंतर २० कि.मी. पेक्षाही कमी आहे. यामुळे फेकरीतील टोल आठ दिवसाच्या आत बंद करावा अथवा येथील वाहनांना टोल माफ करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन छेडू असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, लाेकप्रतिनिधींनीही यात लक्ष घालावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jalgaon Live