जळगाव लाईव्ह न्यूज । प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने उधना ते जयनगर दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीमुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ०९०६१ क्रमांकाची उधना-जयनगर अनारक्षित विशेष गाडी ०५ ते १२ एप्रिल २०२६ या कालावधीत दर रविवारी धावणार आहे. ही गाडी उधना स्थानकाहून पहाटे ०१.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ०२.३० वाजता जयनगर येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे, ०९०६२ क्रमांकाची जयनगर-उधना अनारक्षित विशेष गाडी ०६ ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत दर सोमवारी धावणार आहे. ही गाडी जयनगरहून दुपारी ०५.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.१५ वाजता उधना येथे दाखल होईल.
गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर भारत यांना जोडणाऱ्या या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. खान्देशातही काही स्थानकांवर या गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.नियमित गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण होत असल्याने अनारक्षित डब्यांची मागणी वाढते. हीच बाब लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना-जयनगर दरम्यान अनारक्षित विशेष गाड्यांची योजना आखली आहे.
कोण-कोणत्या स्थानकांवर असेल थांबा?
या विशेष रेल्वे गाडीला चालठाण, बार्डोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारशी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर,प्रयागराज छेवकी, पं. दीन दयाल उपाध्याय, दिलदारनगर, बक्सर, रघुनाथपूर, आरा, पाटणा, बख्तियारपूर, मोकामा, बरौनी, समस्तीपूर, दरभंगा आणि मधुबनी स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

