नागपूर
नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती विधानसभेच्या आगामी पोटनिवडणुकीबाबत महत्त्वाची भूमिका मांडली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि सर्व राजकीय पक्षांनी मन मोठे करून सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा दाखला देताना फडणवीस म्हणाले की, यापूर्वी आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक भाजपने लढवली नव्हती, ज्यामुळे ती बिनविरोध पार पडली होती. बारामतीमध्येही तसाच समंजसपणा सर्व पक्षांनी दाखवावा, अशी विनंती त्यांनी केली. बारामती आणि राहुरी या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना फडणवीसांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

