Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हंताव्हायरस: भीतीची नव्हे, तर सतर्कता आणि वैज्ञानिक तयारीची गरज

हंताव्हायरस: भीतीची नव्हे, तर सतर्कता आणि वैज्ञानिक तयारीची गरज

वळपास तीन वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोविड-१९ महामारी अधिकृतपणे संपल्याची घोषणा केली होती. परंतु, कोविडने जनमानसावर असा काही खोल परिणाम सोडला आहे की, आता जगाच्या पाठीवर कुठेही नवीन संसर्गाची साधी चाहूल लागली, तरी पुन्हा एकदा महामारी पसरण्याची भीती निर्माण होते.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नेमके असेच घडले, जेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने 'हंताव्हायरस' संसर्गाची माहिती जाहीर केली. हंताव्हायरस कुटुंबातील 'अँडीज व्हायरस'च्या संसर्गामुळे तिघांचा झालेला मृत्यू, प्रयोगशाळेत पुष्टी झालेली काही प्रकरणे आणि काही संशयित प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या बातम्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

अशा वेळी हंताव्हायरस हा खरोखरच मोठा धोका आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. येथे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, नवीन संसर्गजन्य आजार समोर येणे ही काही असामान्य गोष्ट नाही; परंतु प्रत्येक संसर्ग म्हणजे महामारीची सुरुवात असतेच असे नाही. हंताव्हायरस हा कोणताही नवीन विषाणू नसून वैज्ञानिक गेल्या सात दशकांपासून याचा अभ्यास करत आहेत. जगातील अनेक भागांमध्ये आढळणाऱ्या या विषाणूचे मुख्य वाहक उंदीर आणि घूस यांसारखे कृंतक जीव (रोडंट्स) असतात. प्रामुख्याने बंदिस्त किंवा खेळती हवा नसलेल्या ठिकाणी संक्रमित उंदरांचे मूत्र, लाळ किंवा विष्ठा यांच्या थेट संपर्कात आल्याने मानवाला याचा संसर्ग होतो.

सध्याच्या उद्रेकाच्या केंद्रस्थानी असलेला 'अँडीज व्हायरस' प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेत आढळतो. हंताव्हायरस कुटुंबातील हा एकमेव असा प्रकार आहे, ज्यामध्ये मर्यादित प्रमाणात व्यक्ती-ते-व्यक्ती संसर्ग शक्य असतो. मात्र, हा संसर्ग कोविडसारखा सहज आणि वेगाने पसरत नाही, तर त्यासाठी अत्यंत जवळचा आणि दीर्घकाळ संपर्क असणे आवश्यक असते. कोणत्याही विषाणूची घातकता केवळ त्याच्या मृत्यूदरावरून ठरत नाही, तर तो किती वेगाने पसरतो यावरही अवलंबून असते. हंताव्हायरसचा मृत्यूदर काही परिस्थितींमध्ये ३० ते ५० टक्क्यांपर्यंत असू शकत असला, तरी त्याचा प्रसार अत्यंत मर्यादित क्षेत्रापुरताच राहतो.

कोविड-१९ हे जागतिक संकट बनण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यात दोन घातक वैशिष्ट्ये एकत्र होती - एकतर त्याचा वेगाने पसरण्याचा अफाट वेग आणि दुसरे म्हणजे जगातील संपूर्ण लोकसंख्येमध्ये त्याविरुद्ध उपजत प्रतिकारशक्तीचा असलेला अभाव. याउलट, हंताव्हायरसचा सामूहिक (कम्युनिटी) प्रसार होण्याची शक्यता नगण्य आहे. हंताव्हायरस आणि कोविड-१९ मध्ये तीन प्रमुख फरक आहेत. पहिला फरक म्हणजे कोविडचा विषाणू पूर्णपणे नवीन होता, तर हंताव्हायरस प्रदीर्घ काळापासून ज्ञात असून त्याचे महामारीविज्ञान (एपिडेमियोलॉजी) वैज्ञानिकांना स्पष्ट समजले आहे. दुसरा फरक म्हणजे कोविड मुख्यतः श्वसनातून हवेद्वारे पसरत होता, तर हंताव्हायरस हा उंदरांच्या संपर्कामुळे होणारा संसर्ग आहे. तिसरा आणि महत्त्वाचा फरक म्हणजे यात कोविडसारखी विद्रोही किंवा स्फोटक प्रसारक्षमता कधीच दिसून आलेली नाही. त्यामुळे सध्याच्या उद्रेकावर वैज्ञानिक लक्ष ठेवणे आवश्यक असले, तरी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. स्वतः जागतिक आरोग्य संघटनेनेही हंताव्हायरसचा जागतिक धोका अत्यंत निम्न पातळीचा असल्याचे मानले आहे.

या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एका जहाजावर दोन भारतीय कर्मचारी उपस्थित असल्याची चर्चा असली, तरी आंतरराष्ट्रीय देखरेख आणि क्वारंटाईन यंत्रणा आधीपासूनच सक्रिय आहेत. त्यातही जहाजावरील संसर्ग हा तुलनेने नियंत्रित वातावरणात असतो, ज्यामुळे तिथे संपर्कात आलेल्या लोकांची ओळख पटवणे, त्यांच्यावर पाळत ठेवणे आणि त्यांना विलगीकरणात ठेवणे अधिक सुव्यवस्थितपणे पार पडले आहे. भारताचा विचार केला तर, आज आपला देश संसर्गजन्य आजारांच्या देखरेखीच्या बाबतीत पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक सज्ज आहे. कोरोना महामारीनंतर आपल्या प्रयोगशाळांची क्षमता वाढली आहे, रोग नियंत्रण यंत्रणा मजबूत झाली आहे आणि जिनोमिक सर्व्हिलन्स नेटवर्क देखील अधिक सक्षम झाले आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) आणि एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) यांसारख्या संस्थांचा अनुभव आता अधिक व्यापक झाला आहे.

परंतु, कोविडने समाजात एक प्रकारचा सामूहिक महामारी-आघात (पँडेमिक ट्रॉमा) सोडला आहे. यामुळे आजकाल आजारांपेक्षा अधिक वेगाने अफवा आणि भीती पसरते. हे समजून घेणे गरजेचे आहे की, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले इशारे हे सामान्य जनतेला घाबरवण्यासाठी नसून, विविध देशांची सरकारे, विमानतळ, बंदरे, रुग्णालये आणि देखरेख संस्थांच्या पूर्वतयारी व समन्वयासाठी असतात.

या सर्व परिस्थितीत भारताने काय केले पाहिजे, हा मुख्य प्रश्न आहे. भारताने आपल्या रोग देखरेख प्रणाली, प्रयोगशाळांचे जाळे, क्षेत्रीय महामारीविज्ञान क्षमता आणि सार्वजनिक आरोग्य मनुष्यबळामध्ये सातत्याने गुंतवणूक करत राहणे गरजेचे आहे. सध्या देशातील विविध राज्यांच्या सज्जतेमध्ये काही प्रमाणात असमानता दिसून येते, ती दूर करावी लागेल. त्याचबरोबर आरोग्याविषयीची जनजागृती आणि जनतेशी साधला जाणारा संवाद तितकाच महत्त्वाचा आहे. कोविडचा सर्वात मोठा धडा हाच होता की, रोगाच्या व्यवस्थापनासोबतच जनतेमधील भीतीचे व्यवस्थापन (फिअर मॅनेजमेंट) करणेही तितकेच आवश्यक असते. हंताव्हायरसचा सद्यस्थितीतील प्रसार हा घबराट निर्माण करण्याचा नसून, केवळ सतर्कता आणि वैज्ञानिक तयारीचा विषय आहे. कोणत्याही नवीन संसर्गाला घाबरून न जाता, प्रत्येक आव्हानाचा शांत, वैज्ञानिक आणि संतुलित पद्धतीने सामना करू शकेल असे सार्वजनिक आरोग्यचे भक्कम कवच निर्माण करणे, हेच भारतासमोरील खरे आव्हान आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama