महाराष्ट्र राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना स्वतः शरद पवार यांनी पूर्णविराम दिला आहे.
शरद पवार यांनी आपल्या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. आमच्या पक्षात कोणतीही फूट पडणार नाही आणि आमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही, असे पवारांनी ठामपणे सांगितले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी नुकताच एक दावा केला होता की, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होईल आणि यासाठी दिल्लीत वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू आहेत. मात्र, शरद पवारांनी हे वृत्त पूर्णपणे फेटाळले आहे. वास्तविक, भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या प्रादेशिक पक्षांनी पुन्हा काँग्रेससोबत यावे आणि शरद पवारांनी याचे नेतृत्व करावे, असा सल्ला शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी दिला होता. यावर सुप्रिया सुळे यांनी, "संजय राऊत हे मोठे बंधू आहेत, त्यांनी चांगला सल्ला दिला आहे, पण पुढे काय होईल हे माहीत नाही," अशी प्रतिक्रिया दिली होती.
शरद पवार यांनी १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) स्थापना केली होती. परंतु, २०२३ मध्ये पक्षात मोठी फूट पडली. अजित पवार यांनी बंडखोरी करत पक्षाचे नाव आणि चिन्ह आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर शरद पवार यांनी 'राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)' या नव्या पक्षाची स्थापना केली आणि ते महाविकास आघाडीसोबत राहिले, तर अजित पवार भाजपच्या महायुती सरकारमध्ये सामील झाले.

