श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील प्रगतशील शेतकरी लालासाहेब पानसरे यांच्या शेतातील उसाचे वीजेच्या शॉर्टसर्किटमुळे जळून नुकसान झाले. सदरील घटना दि.२६ ऑक्टोबर रोजी मंगळवारी सायंकाळी ८ वाजता घडली.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार घारगाव (ता.श्रीगोंदा) येथे बस स्टँड पासून अर्धा कि मी अंतरावर लालासाहेब पानसरे यांची शेतजमीन आहे.शेतात ऊसाचे पीक आहे. त्यांच्या ६६२/३ या गट नंबर मध्ये शेतातून मेन विद्युत पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही लाईन च्या तारा गेल्या आहेत.काल सायंकाळी आठच्या सुमारास ३३ केव्ही लाईन ची एक तार अचानक तुटल्याने शॉर्टसर्किट होऊन उसाला आग लागली. एक एकर ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती समजल्यावर परिसरातील नागरिक आग विझविण्यासाठी धावले. काही वेळातच नागरिकांनी अथक प्रयत्न करून आग विझवली .अन्यथा परिसरातील आणखी ऊसाचे नुकसान झाले असते. सदरील घटना समजल्यामुळे विद्युत कर्मचारी अंबर खामकर, प्रणित पवार ,दीपक साके, नाना साके,नाना बांदल आदींनी घटनास्थळी धाव घेतली.विद्युत वाहिनीची तार तुटल्यामुळे घारगाव,कोळगाव, चिखली,कोरेगाव, कोथुळ आदी गावामधील वीजपुरवठा खंडित झाला.बुधवारी दि.२७ ऑक्टोबर रोजी सकाळी घारगाव येथील कामगार तलाठी स्वप्नील होळकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. बेलवंडी येथील असिस्टंट विद्युत अभियंता आर टी बावस्कर, कोळगाव येथील असिस्टंट अभियंता दीपक कुमार सिंग यांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानीची पाहणी केली.३३केव्ही लाईनची तार जोडण्यासाठी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नाने बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सदरील तार जोडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. सदरील जळालेल्या उसाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी घारगाव येथील शेतकरी लालासाहेब पानसरे यांनी केली आहे.

