Tanpure's withdrawal from the election? : राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, सोमवारी सकाळी घडलेल्या एका अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अचानक प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीसाठी हजेरी लावली. या तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीदरम्यान एक महत्वाची घडामोड घडल्याचे समजते. रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा घडवून आणली. या संभाषणात राहुरी मतदारसंघातील विकासाच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेतली गेल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना प्राजक्त तनपुरे यांनी सावध भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांनी त्यांना विनंती केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामांबाबत साकारात्मक आश्वासन दिले आहे. मात्र अंतिम निर्णय घेण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझा उमेदवारी अर्ज भरून तयार आहे. ज्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायची आहे, तेच प्रश्न सोडवण्याची तयारी सरकारने दाखवली असेल, तर मला सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल, असे ते म्हणाले. त्यांच्या या भूमिकेमुळे ते माघार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, रवींद्र चव्हाण यांनी देखील माध्यमांशी बोलताना पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या परंपरेचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, एखाद्या लोकप्रतिनिधींच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्य निवडणुकीला सामोरे जात असल्यास ती निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. प्राजक्त तनपुरे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्वांनी एकत्र काम केले आहे. राहुरी मतदारसंघातील विकासाचे प्रश्न एकत्रितपणे सोडवता येऊ शकतात. त्यामुळे त्यांनी माघार घ्यावी, अशी आमची विनंती आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
राहुरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर देखील या चर्चेत भर देण्यात आला. रोजगारनिर्मिती, एमआयडीसी उभारणी, तसेच धरणांमधील गाळ काढण्यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांकडे प्राजक्त तनपुरे यांनी लक्ष वेधले. या सर्व प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन देत, महायुती सरकार त्यांच्या मागण्यांबाबत सरकारी करेल, असे देखील चव्हाण यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने या निर्णयाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. आता प्रजकपट तनपुरे कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय काय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुरीतील ही राजकीय घडामोड पुढील काही तासांत कोणते वळण घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

