सैन्य ही देशाची वेगळी आणि स्वाभिमानी संस्था आहे. भाजपने स्वतःवरील टीका टाळण्यासाठी देश किंवा सैन्याच्या नावामागे ‘भ्याडपणे’ लपू नये, असा हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, आम्ही तुमच्यावर टीका करतोय, देशावर नाही. त्यांनी सांगितले की, जेव्हा विरोधक भाजपवर टीका करतात, तेव्हा ती टीका देशावर किंवा सैन्यावर नसते, तर ती केवळ भाजप या राजकीय पक्षावर असते. भाषणाच्या शेवटी त्यांनी ’16’ या अंकाचा उल्लेख करत एक कोडे घातले आणि सांगितले की भाजपच्या सर्व समस्यांचे उत्तर या 16 अंकामध्ये दडलेले आहे, जे लवकरच समोर येईल, असे ते म्हणाले.
हे विधेयक महिलांच्या सक्षमीकरणासाठी नसून मतदारांचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यांनी सांगितले की, भाजप हे विधेयक लागू करण्यासाठी 10-15 वर्षांचा वेळ घेत आहे, जर त्यांना खरोखरच आरक्षण द्यायचे असेल तर ते आता या क्षणापासून लागू करावे, असे आव्हान त्यांनी दिले. देशाच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्च पदे, नोकरशाही आणि न्यायपालिकेत ओबीसी, दलित किंवा आदिवासी समुदायाचे लोक कुठे आहेत? असा प्रश्न त्यांनी विचारला.
भाजप या समुदायांना हिंदू म्हणते, पण त्यांना सत्तेच्या रचनेत जागा देत नाही, असा आरोप त्यांनी केला. सरकार जातीनिहाय जनगणनेपासून पळ काढत आहे. ओबीसी बांधवांना त्यांचे हक्क आणि सत्तेत वाटा मिळू नये म्हणून हा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. निवडणुका जिंकण्यासाठी आणि आपली ताकद टिकवण्यासाठी भाजप दक्षिण भारतीय आणि ईशान्येकडील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे राष्ट्रविरोधी कृत्य असल्याचे त्यांनी म्हटले.

