Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

मनोज जरांगे पाटलांचे अंतरवालीत पुन्हा आमरण उपोषण सुरू; दीड तासांची विखे-पाटलांची बैठक निष्फळ

मराठा आरक्षणाच्या मुख्य मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज ३० मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आपले आमरण उपोषण सुरू केले आहे.

मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात त्यांनी गावातील मोकळ्या मैदानावर बाजेवर बसून आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.
आंदोलनस्थळी कोणतीही गडबड किंवा गोंधळ होऊ नये, यासाठी मनोज जरांगे यांनी यावेळी एक आगळावेगळा पवित्रा घेतला आहे. त्यांनी उपस्थित मराठा आंदोलकांना हातात काठी घेऊन आंदोलन स्थळापासून एका निश्चित अंतरावर शिस्तीत बसण्याचे आवाहन केले आहे. आंदोलनातील शिस्त राखण्यासाठी जरांगे पाटील यांनी स्वतः काठीने जमिनीवर एक रेषा ओढून दिली असून, या रेषेच्या पलीकडेच सहकाऱ्यांनी बसावे, असे स्पष्ट केले आहे.
या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने काल २९ मे रोजी आंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी काल रात्री जवळपास दीड तास जरांगे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. विखे पाटलांनी सरकार सकारात्मक असल्याचे सांगत जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र जरांगे यांची मनधरणी करण्यात सरकारला अपयश आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan