नागपूर : नागपूरच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’मध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका २० वर्षीय विद्यार्थ्याने परीक्षेच्या तणावातून अत्यंत वेदनादायक पद्धतीने आत्महत्या केली आहे.
या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
कोल्हापूरचा रहिवासी असलेला श्रेयस माने हा IIIT नागपूरमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. सोमवारपासून त्याची चौथ्या सत्राची परीक्षा सुरू होणार होती. मात्र, परीक्षेच्या काही तास आधीच, पहाटेच्या सुमारास श्रेयसने वसतिगृहाच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली.
पोलिस तपासात समोर आलेली माहिती पाहून सर्वांचेच काळीज चर्रर्र होत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी श्रेयसने स्वत:ला असह्य यातना दिल्या होत्या. त्याने आपल्या दोन्ही हातांच्या नसा कापल्या होत्या. उडी मारताना आवाज येऊ नये म्हणून तोंडात कापड कोंबून त्यावर टेप चिकटवला होता, इतकेच नाही तर नाकातही ‘च्युइंगम’ टाकले होते. या अवस्थेत त्याने मृत्यूला कवटाळले.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयसचे पहिल्या वर्षाचे काही विषय ‘बॅक’ होते आणि दुसऱ्या वर्षाचेही काही पेपर त्याने दिले नव्हते. याच शैक्षणिक तणावातून त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर संतापलेल्या विद्यार्थ्यांनी रात्रभर कॅम्पसमध्ये आंदोलन केले. संस्थेचे जाचक नियम आणि विद्यार्थ्यांवरील मानसिक दडपण याला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
बुटीबोरी पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मात्र, एका तरुण आणि हुशार विद्यार्थ्याच्या अशा अंतामुळे कोल्हापूर आणि नागपूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

