सोलापूर : राज्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या घटना चिंताजनकरीत्या समोर येत असून रूग्णसंख्येत देखील मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे 24 वर्षीय युवकाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याचबरोबर लातूरमध्येही एका वृद्ध शेतकर्याचा मृत्यू झाल्याने परिस्थितीची गंभीरता अधोरेखित झाली आहे.
पंढरपूरमधील दिनेश प्रकाश देशमुख (वय 24) हा युवक काही दिवसांपूर्वी दुपारच्या कडक उन्हातून घरी परतल्यानंतर अस्वस्थ झाला. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, सुमारे साडेतीन ते चारच्या सुमारास त्याची प्रकृती बिघडली आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. संबंधित युवकाचे घर पत्र्याच्या शेडचे असल्याने आतल्या तापमानात अधिक वाढ झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे उष्णतेच्या तीव्रतेमुळेच हा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमान 43 ते 44 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचत आहे. सकाळीच ऊन तीव्र होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पंढरपूरमध्ये अलीकडेच उष्णतेच्या लाटेत एका चारचाकी वाहनाला आग लागून ते जळून खाक झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्याची गरज अधोरेखित होत आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे 75 वर्षीय शेतकरी त्र्यंबक नारायण बेळंबे यांचा मृत्यू झाला. ते दुपारच्या सुमारास शेतात काम करत असताना अचानक चक्कर येऊन खाली कोसळले. त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे लातूर जिल्ह्यात उष्माघातामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चारवर गेल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील इतर भागांमध्येही उष्णतेची तीव्रता वाढली असून विदर्भात काही ठिकाणी तापमान 47 अंश सेल्सियसपर्यंत नोंदवले गेले आहे. अकोल्यासह अनेक जिल्ह्यांत तापमानाने 46 अंशाचा टप्पा ओलांडला आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने उष्माघाताच्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरात आतापर्यंत 60 उष्माघातग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून, मार्च ते एप्रिलदरम्यान 38 रुग्ण आढळले आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये 17 रुग्ण नोंदवले गेले होते. दोन मृत्यूंची नोंद असली तरी त्यांच्या नेमक्या कारणांबाबत अजून स्पष्टता नसल्याचे अधिकार्यांनी सांगितले. सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येत असून, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर आणि चंद्रपूर या भागांमध्ये रुग्णसंख्या तुलनेने अधिक आहे.
सर्व जिल्हा, उपजिल्हा रूग्णालयात 'उष्माघात कक्ष' सुरू
राज्यातील सर्व जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये विशेष 'उष्माघात कक्ष' सुरू करण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक खाटा, औषधे आणि द्रवपदार्थांची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने उपचार मिळू शकतील. उष्णतेच्या वाढत्या लाटेमुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे आणि हलके, सैल कपडे परिधान करणे यांसारख्या खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

