नागपूर : भाजपच्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांना मार्गदर्शन करताना पद, सत्ता आणि नम्रतेबाबत थेट पण विचारप्रवर्तक संदेश दिला. त्यांच्या भाषणात राजकारणातील अस्थिरता, नेतृत्वातील बदल आणि संस्कृतीशी असलेली नाळ यावर विशेष भर होता.गडकरी म्हणाले की, सत्तेची खुर्ची ही कायमस्वरूपी नसते.
खुर्चीवर बसलेला प्रत्येकजण एक ना एक दिवस उठणारच आहे. जर स्वतःहून उठला नाही, तर परिस्थिती त्याला उठवते, अशा शब्दांत त्यांनी सत्तेच्या क्षणभंगुरतेची जाणीव करून दिली. पद मिळाल्यानंतर अहंकार न बाळगता शांत आणि संयमी राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पद कधीही जाऊ शकते, त्यामुळे त्याचा गर्व न करता जबाबदारीने वागा, असा सल्लाही त्यांनी दिला.
नेतृत्वाच्या बदलाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, राजकारणात पिढ्या बदलत राहतात आणि त्यानुसार नेतृत्वही विकसित झाले पाहिजे. नेता हा केवळ कुटुंबातूनच तयार व्हावा असे नाही, तर कार्यकर्त्यांमधूनही सक्षम नेतृत्व घडले पाहिजे, असे ते म्हणाले. यामुळे संघटनेत नवे चेहरे आणि विचारांना संधी मिळते, असेही त्यांनी नमूद केले. आपल्या अनुभवांचा संदर्भ देताना गडकरींनी इराण भेटीतील एक प्रसंग सांगितला. जहाजबांधणी खात्याची जबाबदारी सांभाळत असताना चाबहार बंदर प्रकल्पासाठी त्यांना अनेक वेळा इराणला जावे लागले होते. त्या काळात तणावपूर्ण परिस्थिती असूनही त्यांनी काम सुरू ठेवले. एका प्रवासादरम्यान पाकिस्तानने त्यांच्या विमानाला परवानगी नाकारल्यामुळे त्यांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागल्याचा अनुभव त्यांनी कथन केला. इतिहास आणि संस्कृतीच्या संदर्भात त्यांनी भारताचे इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांशी असलेले जुने संबंध अधोरेखित केले. त्यांनी अयातुल्ला खोमेनी यांची भेट घेतल्याची आठवण सांगत पर्शियन आणि संस्कृत भाषांमधील नातेही मांडले. भारताची सांस्कृतिक परंपरा व्यापक आणि प्राचीन असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

