माहूर : शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणार्या रुग्णांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने 500 लिटर क्षमतेचा अत्याधुनिक वॉटर फिल्टर प्लांट उभारण्यात आला आहे.
ऐन उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ग्रामीण रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. वाढत्या उष्णतेमुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत होती. ही बाब लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने श्री रेणुका देवी संस्थानकडे वॉटर फिल्टरची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नरेंद्र के. ब्रम्हे यांनी तत्काळ वॉटर फिल्टर प्लांट मंजूर करून रुग्णालयात बसवून दिला. या फिल्टर प्लांटमुळे आता रुग्णांना स्वच्छ, थंड व सुरक्षित पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत होणार असून रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याची सुविधा अधिक सक्षम झाली आहे. या उपक्रमाबद्दल रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह रुग्णालय प्रशासनाने श्री रेणुका देवी संस्थानचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
