किनवट : कुलरचा जोरदार विजेचा धक्का लागल्याने एका १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयेश पांडुरंग मिराशे (वय १९ वर्षे) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयेश मिराशे हा मूळचा दरसांगवी येथील रहिवासी असून सध्या तो किनवट जवळील गोकुंदा येथे वास्तव्यास होता. अत्यंत हुशार आणि मनमिळावू स्वभाव असलेल्या जयेशला कुलरचा शॉक लागला. हा धक्का एवढा भीषण होता की, यातच त्याची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी जयेशने जगाचा निरोप घेतल्याने परिसरात अत्यंत हळहळ व्यक्त होत आहे.
एक हुशार आणि आशेचा किरण असलेला तरुण अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने मिराशे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दरसांगवी व गोकुंदा परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांमधून मोठी खंत व्यक्त केली जात आहे.

