लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी बच्चू कडू हे आज (दि. ३०) शिवसेनेकडून (शिंदे गट) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावर स्वतः बच्चू कडूंनी माध्यमांसमोर स्पष्ट भूमिका मांडत, हा निर्णय शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांच्या हितासाठी घेत असल्याचं सांगितलं.
बच्चू कडू म्हणाले की, "मी धनुष्यबाण हाती घेत आहे तो केवळ सत्तेसाठी नाही, तर शेतकरी आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आहे. २४ तासात एकनाथ शिंदेंसोबत शेतकऱ्यांच्या हमीभावावर चर्चा झाली, पेरणीपासून ते कापणीपर्यंची चर्चा झाली, दिव्यांगाच्या, आदिवासींच्या संदर्भात चर्चा झाली, त्यांनी सहमती दर्शवली त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला." त्यांनी 'लाडकी बहिण' योजनेत विधवा महिलांकडे दुर्लक्ष होत असल्याचाही मुद्दा उपस्थित केला.
दिव्यांग मंत्रालयाच्या बळकटीकरणावरही त्यांनी भर दिला. "शिंदे साहेबांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं, पण त्याला अधिक सक्षम करण्याची गरज आहे. या सर्व मागण्या मान्य झाल्यानंतरच मी हा निर्णय घेतला," असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेची राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगतानाच, शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर कोणताही तडजोड होणार नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.
मंत्रीपदाबाबत बोलताना कडूंनी स्पष्ट केलं की, " मला मंत्रीपदाचं काही नाही, मला काही मागायची सवय नाही, मला मंत्रीपद हवं असतं तर मागे गुवाहाटीला गेलो होते, तेव्हाच मागितलं असतं ना, आम्ही दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत बसलो आहे, लोक मंत्रीपदासाठी फिंल्डींग लावत होती, पण मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो, हाच फरक आहे, बच्चू कडूचा हे समजून घ्या, असंही कडूंनी म्हटलंय.” दरम्यान माझं काम आहे कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करणं, जन्म शिवसेनेचा आणि शेवटही शिवसेनेत व्हावा असंही कडू पुढे म्हणाले. प्रहार संघटना राहिलं, ज्याला सामाजिक काम करायचं आहे, त्यासाठी प्रहार राहिलं, असंही कडू पुढे म्हणालेत.

