लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रात १७ जागांवरील विधान परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाचा मविआतील काँग्रेसमधील ६० ते ७० नगरसेवक बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील काही नगरसेवक अचानक संपर्काबाहेर गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घडामोडींमुळे निवडणुकीत मोठ्या प्रमाणात 'घोडेबाजार' सुरू असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. एका मतासाठी लाखोंच्या व्यवहाराची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली असून काही नगरसेवकांना आगाऊ रक्कम देण्यात आल्याचाही दावा केला जात आहे.
काँग्रेसमधील मोठा गट अचानक संपर्काबाहेर गेल्यानंतर भाजप नेते नगरसेवकांना दुसरीकडे हलवत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि नाराजीमुळेही ही परिस्थिती निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः शिवानी वडेट्टीवार यांच्या संभाव्य उमेदवारीनंतर पक्षात नाराजी वाढल्याची चर्चा असून त्यामुळे अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला आहे.
संपर्काबाहेर गेलेल्या नगरसेवकांमध्ये चिमूर, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी आणि सावली येथील सदस्यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. ही सर्व क्षेत्रे वडेट्टीवार यांच्या प्रभावक्षेत्रातील मानली जात असल्याने या घडामोडींना राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे हा प्रकार वडेट्टीवार गटासाठी धक्का मानला जात आहे.
दरम्यान, भाजपवर होत असलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. महायुती सर्व १७ जागांवर विजय मिळवेल, असा दावा त्यांनी केला. "या निवडणुकीत महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ आहे. जवळपास ८०० पैकी ६०० मते आमच्या बाजूने आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे," असे बावनकुळे म्हणाले. तसेच, संख्याबळ नसल्यास निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, असे मत व्यक्त करत त्यांनी हर्षवर्धन सपकाळ, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

