लोकशाही न्यूज नेटवर्क
सोशल मीडियावरील एका कमेंटवरून पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात राजकीय गदारोळ झाला झाला. शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुकवर वादग्रस्त कमेंट केल्याच्या रागातून एका तरुणाला घरातून उचलून आणून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
महिला नगरसेविकेसह त्यांच्या समर्थकांवर तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा परिसरातील एका तरुणाने सोशल मीडियावर राजकीय आणि वैयक्तिक स्वरूपाची कमेंट केली होती. ही कमेंट शिंदेसेनेच्या महिला नगरसेविकेला आणि त्यांच्या समर्थकांना आवडली नाही. या कमेंटचा राग मनात धरून महिला नेत्याच्या काही समर्थकांनी संबंधित तरुणाला त्याच्या घरातून जबरदस्तीने बाहेर काढले आणि कार्यालयात आणून त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर पीडित तरुणाने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिला नगरसेविका आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरील पोस्टची पाहणी केली जात आहे.
दोन्ही पक्षांकडून आलेल्या तक्रारींनंतर पीडित व्यक्ती आणि आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी, वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नगरसेविका आणि शिवसेना नेत्या हेमलता सिंह, तसेच इतर अनेक संशयित अद्याप फरार आहेत.
मूळ घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वकर्मा नावाच्या एका व्यक्तीने फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवरूनच संपूर्ण वादाची ठिणगी पडली. विश्वकर्मा यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, अर्जुन दुबे नावाच्या एका व्यक्तीने नालासोपारा येथील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते.
दरम्यान विश्वकर्मा हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा तिथे शिवसेनेच्या (शिंदेगट) स्थानिक नगरसेविका हेमलता सिंग आणि त्यांचे सहकारी अमरीश आधीपासूनच उपस्थित होते. तक्रारीनुसार हॉटेलमध्ये पोहोचताच विश्वकर्मा यांना धक्काबुक्की करत कानशिलात मारण्यात आली.
तसेच बांबूच्या काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता या हल्ल्यादरम्यान सोन्याची साखळी हिसकावून घेण्यात आली आणि २० हजार रुपयांचा स्मार्टफोन चोरला गेला, असा गंभीर आरोपही विश्वकर्मा यांनी केला आहे.

