लोकशाही संपादकीय लेख
आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची धावपळ आणि श्री गणेशाच्या स्थापनेची धामधूम सुरू असतानाच जळगावात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. जुने जळगाव परिसरातील तळेले कॉलनी येथे एका महिलेने आपल्या पाच वर्षांच्या मुलासह जीवन संपवल्याची घटना समोर आली.
तळेले कॉलनी येथे हेमांगी निखिल महाजन या आपल्या पाच वर्षांच्या मुलासह राहत होत्या. त्यांचे पती निखिल महाजन हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असून सध्या राजस्थान येथे सेवेत आहेत. घटनेच्या दिवशी निखिल यांच्या आई, म्हणजेच हेमांगी यांच्या सासू, वरच्या मजल्यावरून खाली आल्या आणि त्यांनी हेमांगी यांना आवाज दिला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यामुळे त्या घाबरल्या आणि त्यांनी नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. नातेवाईकांनीही दार वाजवून आणि आवाज देऊन पाहिले; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी शनीपेठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराचा दरवाजा उघडला असता हेमांगी महाजन आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा शौर्य हे दोघेही घरात गंभीर अवस्थेत आढळून आले.
त्यांना तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. श्री गणेशाच्या स्थापनेच्या उत्साहाचा दिवस असतानाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हेमांगी या २९ वर्षांच्या होत्या.
त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा पोलीस तपास करीत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हेमांगी आणि त्यांचे पती निखिल यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याची चर्चा आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेमागील सत्य समोर येणार आहे. कौटुंबिक जीवनात निर्माण होणारे मतभेद किंवा वाद कितीही गंभीर वाटत असले, तरी अशा प्रसंगी कुटुंबीय, नातेवाईक किंवा विश्वासू व्यक्तींशी संवाद साधणे महत्त्वाचे ठरते. अडचणीच्या काळात समुपदेशनाची मदत घेणेही आवश्यक आहे. या घटनेमुळे निखिल महाजन यांचे कुटुंब उघड्यावर आले असून, पाच वर्षांचा शौर्य आणि पत्नी हेमांगी यांना गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

